वादग्रस्त धार्मिक पोस्ट केल्याप्रकरणी न्यायालयाने सुनावली कुराण वाटण्याची शिक्षा


रांची : फेसबुकवर धार्मिक वादग्रस्त पोस्ट टाकल्याप्रकरणी एका विद्यार्थिनीला रांचीच्या दिवाणी न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. पण न्यायालयाने जामीन देताना त्या मुलीला मुस्लिम धर्माच्या पवित्र कुराणाच्या पाच प्रति वाटण्याचे निर्देश दिले आहेत. आता या निर्णयामुळे नवा वाद निर्माण झाला असून यामुळे हिंदू संघटना नाराज झाल्या आहेत. दरम्यान 15 दिवसांत आदेशाचे पालन केले जाईल असे आश्वासन सदर मुलीच्या वकिलांनी दिले आहे. मात्र न्यायालयाच्या निर्णयावर हिंदू संघटना आणि स्थानिक भाजपा नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

रांचीच्या रिचा भारती नावाच्या मुलीने काही दिवसांपूर्वी तबरेज मॉब लिंचिंग प्रकरणासंदर्भात एक वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर केली होती. तिच्या विरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन तिला अटक करण्यात आली होती. तिला यानंतर कोर्टात हजर करण्यात आले. जिल्हा न्यायाधीश मनीष सिंह यांनी यावेळी रिचाचा जामीन मंजूर केला. पण तिला जामीन मंजूर करताना कुराणच्या पाच कॉपी वाटण्याचे आदेश दिले. यातील एक कॉपी अंजुमन इस्‍लामिया कमिटीला आणि चार प्रति विविध शाळा आणि कॉलेजमध्ये वाटण्यास सांगितले आहे.

रिचाने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. तिने यावर म्हटले आहे की, याआधीही अशा प्रकारच्या घटना घडल्या आहेत. आरोपींना त्यावेळी मंदिरात जाऊन हनुमान चालीसा आणि गीता वाचण्यास का सांगितले नाही. आपल्यासोबत अन्याय झाला असल्याचे तिने म्हटले आहे. या निर्णयाबाबत हिंदू जागरण मंचाने देखील नाराजी व्यक्त केली आहे. फेसबुकवर हिंदू देवी देवतांच्या विरोधात देखील अशा पोस्ट करून अपमान केले जातात. मात्र अशा प्रकारचे काहीही वाद होत नाहीत. मात्र हे काहीतरी षडयंत्र आहे, असा आरोप हिंदू जागरण मंचाने केला आहे.

Leave a Comment