सिद्धिविनायक मंदिर न्यास दत्तक घेणार धरण फुटून उद्ध्वस्त झालेले तिवरे गाव


मुंबई : मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर न्यासाने धरण फुटून उद्ध्वस्त झालेलं रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्याती तिवरे गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली. तिवरे गाव दत्तक घेण्याची विनंती सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडे रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी केली होती.

2 जुलै रोजी कोकणात झालेल्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतील तिवरे धरण फुटले. 23 जणांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यापैकी 20 जणांचे मृतदेह सापडले, मात्र तीन जणांचा शोध लागलाच नाही. धरण फुटल्यामुळे सात गावांमध्ये पाणी घुसले, परंतु तिवरे गावाचे सर्वाधिक नुकसान झाले.

तिवरे गाव दत्तक घेण्याची मागणी यानंतर रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी केली. सिद्धिविनायक मंदिर न्यासाने या मागणीवर विचार करुन गाव दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. गावातील उद्ध्वस्त झालेली घरे, शाळा न मंदिर न्यास नव्याने बांधून देणार आहे. तसेच गृहपयोगी साहित्यही उपलब्ध करुन देणार आहे.

सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर याबाबत म्हणाले की, अनेक कुटुंब तिवरे धरण फुटून उद्ध्वस्त झाली, अनेक संसार नाहीसे झाले. अशा परिस्थितीत या गावाचे पुनर्वसन करण्याचा निर्णय मंदिर न्यासाने घेतला आहे. त्या गावासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. खासदार विनायक राऊत आणि आमदार उदय सामंत यांच्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन, गावाच्या पुनर्वसनासाठी भरीव निधी ठेवण्यात आला आहे. पुढील मान्यतेसाठी हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला आहे.

Leave a Comment