पाकिस्तानच्या हद्दीतुन होणार भारतीय विमानांची ये-जा


इस्लामाबाद – आजपासून (मंगळवार) भारतासाठी पाकिस्तानने नागरी विमानांसाठी बंद केलेली हवाई हद्द खुली केली आहे. फेब्रुवारी महिन्यात भारताने बालाकोटमधील दहशतवादी तळांवर केलेल्या एरीयल स्ट्राईकनंतर पाकिस्तानने आपली पूर्वेकडील हवाई हद्द भारतीय विमानांसाठी बंद केली होती. त्यावरील निर्बंध आता उठविण्यात आले आहेत. पाकिस्तानने बालाकोट हल्ल्यानंतर हवाई हद्द भारतासाठी खुली करण्यास नकार दिला होता. सीमेजवळील हवाई तळांवरील लढाऊ विमाने भारत मागे घेत नाही, तोपर्यंत पाकिस्तानची पूर्वेकडील हवाई सीमा भारतासाठी बंद असेल, असा पवित्रा पाकिस्तानने घेतला होता.

पाकिस्तान नागरी उड्डान विभागाने हवाई हद्द नागरी विमानांसाठी खुली केल्याची माहिती दिली आहे. एका नोटीसीद्वारे सर्व प्रकारच्या प्रवासी विमानांना हवाई हद्द खुली केल्याचे सूचना देण्यात आली आहे. पाकिस्तानची हवाई हद्द बंद असल्याने परदेशात जाणाऱ्या आणि येणाऱ्या भारतीय विमानांना तसेच परेदशी विमान कंपन्याना पाकिस्तानला वळसा घालून जावे लागत होते. त्यामुळे विमान कंपन्यांच्या खर्चात वाढ झाली होती. तसेच प्रवासासाठी वेळही जास्त लागत होता. एप्रिल महिन्याच्या मध्यामध्ये पाकिस्तानमधून जाणाऱ्या ११ हवाई मार्गांपैकी फक्त १ मार्ग खुला करण्यात आला होता. त्यामुळे परदेशी तसेच भारतीय विमान कंपन्यांना तोटा सहन करावा लागत होता. तसेच विमान प्रवासास अधिकचा वेळ लागत होता.

Leave a Comment