श्रीहरीकोटा – काही तांत्रिक कारणामुळे भारताच्या महत्वाकांक्षी मोहीमेपैकी एक मानल्या जाणाऱ्या चांद्रयान-२ चे प्रक्षेपण लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती इस्रोने पत्रकार परिषद घेऊन दिली आहे. जवळपास 56 मिनिटांपूर्वीच चांद्रयान 2 मोहिमेच्या प्रेक्षपणाचे काऊंटडाऊन थांबवण्यात आले होते. भारताचे हे यान 15 जुलैच्या मध्यरात्री 2 वाजून 51 मिनिटांनी अवकाशात झेपावणार होते. पण यामध्ये काही तांत्रिक त्रुटी इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या लक्षात आल्यामुळे ही मोहीम त्यांना तात्पुरती स्थगित करावी लागली.
तांत्रिक कारणामुळे ‘चांद्रयान’- 2 चे प्रक्षेपण लांबणीवर
इस्रो लवकरच चांद्रयान-2 च्या प्रक्षेपणाची नवीन वेळ आणि तारीख जाहीर करणार आहे. हे चांद्रयान-2 आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा येथून अवकाशात झेपावणार होते. ‘चांद्रयान-2’ लॉन्चिंग नंतर 52 दिवसांनी चंद्रावर पोहोचणार होते. इस्रोच्या या महत्त्वकांक्षी मोहीमेकडे केवळ भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचेही लक्ष लागले होते. ही मोहीम यशस्वी झाल्यास या प्रकारची शक्ती असलेला अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत चौथा देश ठरणार आहे.