रद्द झालेल्या तिकिटांमधून भारतीय रेल्वेने कमावले १५०० कोटी


नवी दिल्ली: गेल्या काही महिन्यांमध्ये एरवी कायम तोट्यात असणाऱ्या भारतीय रेल्वेला अच्छे दिन आल्याचे दिसत असून तिकिट रद्द करण्याच्या शुल्कातून गेल्या वर्षभरात रेल्वेने थोडीथोडकी नव्हे तर तब्बल १५०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. रेल्वेला या माध्यमातून १५३६.८५ कोटींचे उत्पन्न मिळाले असल्याचे माहिती अधिकारातंर्गत समोर आले आहे.

रेल्वेकडून एखाद्या प्रवाशाने आरक्षित तिकीट रद्द केले तर त्यासाठी विशिष्ट शुल्क आकारले जाते. रेल्वेची या माध्यमातून किती कमाई होते, हे जाणून घेण्यासाठी मध्य प्रदेशमधील आरटीआय कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती मागवली होती. ही सर्व माहिती यानंतर समोर आली. त्यानुसार आरक्षित तिकीटे रद्द करण्यासाठी आकारण्यात आलेल्या शुल्कामधून रेल्वेला १५१८.६२ कोटी आणि यूटीएसमधून खरेदी केलेली तिकिटे रद्द केल्यामुळे १८.२३ कोटी रुपयांचे उत्त्पन्न मिळाल्याची माहिती रेल्वेने दिली. याशिवाय, रेल्वे तिकीट रद्द करण्याच्या शुल्कात कपात करणार का, असा प्रश्नही चंद्रशेखर गौड यांनी विचारला होता. मात्र, त्यावर रेल्वे प्रशासनाकडून कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही.

Leave a Comment