शुक्रवारपासून आदित्य ठाकरेंची ‘जन आशीर्वाद यात्रा’


मुंबई : शिवसेनेच्यावतीने आगामी विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु करण्यात आली आहे. शिवसेनेच्यावतीने महाराष्ट्राभर ‘जन आशिर्वाद यात्रा’ युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येणार आहे. शिवसेनेचे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘आदित्य संवाद’नंतर दुसरे महत्वाचे पाऊल आहे.

या जन आशिर्वाद यात्रेचे आयोजन ज्यांनी मत दिले आहे, त्यांचे आभार मानायचे आहेत, तर ज्यांनी नाही दिली, त्याची मने जिंकायची आहे, अशा मथळ्याखाली करण्यात आले आहे. आदित्य ठाकरे शुक्रवारपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर निघणार असून ते घराघरात पोहचण्याचा प्रयत्न करणार आहे. आदित्य ठाकरे येत्या काळात शिवसेनेचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असू शकतो त्याच पार्श्वभूमीवर हा दौरा त्यांच्यासाठी महत्वाचा असणार आहे.

याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात विकास यात्रा जाहिर केली आहे. फडणवीस ऑगस्ट महिन्यात ‘फिर एक बार शिवशाही सरकार’ ही विकास यात्रा काढणार आहेत. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर भाजप आणि शिवसेना दोघेही निघणार असल्याने या दोन्ही यात्रांना राजकीय महत्त्व प्राप्त झालं आहे.

Leave a Comment