31 जुलैपर्यंत पर्यटकांना माळशेज घाटात प्रवेश नाही


ठाणे – सध्या पावसाने चांगलाच जोर पकडलेला आहे. त्यातच आकाड साजरा करण्यासाठी आपल्यापैकी काहीजण खूपच उत्सुक असतात. पण यावेळी ते जर पावसाळी सहलीसाठी माळशेज घाट हा पर्याय निवडणार असतील तर त्यांच्यासाठी बातमी खुप वाईट आहे.

दरवर्षीच निसर्गप्रेमींच्या यादीत पावसाळी सहलीचा प्लॅन आखताना माळशेज घाटाचे नाव पहिल्या स्थानी असते. पण माळशेज घाटात मागील काही दिवसात वारंवार दरड कोसळत असल्याच्या घटनांनी पर्यटकांच्या सुरक्षेवर प्रश्न उभे राहिले आहे. दरड कोसळून होणारे अपघात टाळण्यासाठी माळशेज घाटात येणाऱ्या पर्यटकांना 31 जुलैपर्यंत घाटात पर्यटनबंदी करण्यात आली आहे.

यासंदर्भातील वृत्त महाराष्ट्र टाईम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी याबाबतचे लेखी आदेश लागू केले आहेत. हा निर्णय माळशेज घाटात दरडी पडण्याचे प्रकार तसेच यापूर्वी घडलेल्या दुर्घटनांच्या अनुषंगाने घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

मुंबईसह पुणे, नगर, नाशिक भागातून हजारो पर्यटक पावसाळ्यामध्ये माळशेज घाटात गर्दी करत असतात. त्यानुसार माळशेज घाटातील चार धबधबे तसेच पर्यटन विभागाने विकसित केलेले दोन पॉइंट या ठिकाणांवर पोलिसांचे खास लक्ष असणार आहे. सहायक पोलिस निरीक्षक सुहास खरमाटे यांच्या माहितीनुसार माळशेज घाटातील काही तलाव तसेच लेण्यांजवळ जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. माळशेज घाट, गणेश लेणी, पडाळे डॅम, सिद्धगड या ठिकाणांचा यात समावेश आहे.

दरम्यान, माळशेज घाटातून वाहतूक सुरू असेल. पण तेथे पर्यटकांना कोठेही थांबता येणार नाही. येत्या शनिवार, रविवार तसेच लागून येणाऱ्या सुट्ट्यांच्या दिवशी माळशेज घाटात दोन पोलिस अधिकाऱ्यांसह 35 पोलिस कर्मचाऱ्यांचा कडक बंदोबस्त असणार आहे. तसेच घाटमार्गावर इतर दिवशी पोलिसांकडून गस्त घालण्यात येणार आहे. बेताल वर्तन करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारावाई करण्यात येणार आहे.

Leave a Comment