देशातील ‘या’ मार्गावर धावणार पहिली खासगी रेल्वे


लखनौ – सध्याच्या घडीला देशातील बहुतांश सर्वच क्षेत्रांचे खासगीकरण होत आहे. त्यातच अद्यापही रेल्वे सेवा संपूर्णपणे सरकारी अधिपत्याखाली आहे. पण आता सरकार लखनौ ते दिल्लीदरम्यान धावणारी तेजस एक्सप्रेस खासगी कंपनीला चालविण्यासाठी देणार आहे. ही देशातील पहिली खासगी रेल्वे असणार आहे.

काही संघटनांनी रेल्वेच्या खासगीकरणाला तीव्र विरोध केला असला तरी १०० दिवसीय मोहीम या कार्यक्रमांतर्गत दोन रेल्वे खासगी क्षेत्राला देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. २०१६ मध्ये दिल्ली-लखनौ या तेजस एक्स्प्रेस रेल्वेची घोषणा करण्यात आली होती. नुकतेच या रेल्वेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

लखनौ रेल्वे स्टेशनमधून तेजस एक्स्प्रेस (रेल्वे क्रमांक १२५८५) ही सकाळी ६ वाजून ५० मिनिटाला सुटणार आहे. तर दुपारी १.३५ मिनिटाला नवी दिल्लीला पोहोचणार आहे. परतीच्या मार्गावर (रेल्वे क्रमांक १२५८६ ) ही नवी दिल्लीहून दुपारी ३.३५ ला सुटणार आहे. तर लखनौला रात्री १० वाजून ५ मिनिटाला पोहोचणार आहे. रविवार आणि गुरुवार वगळता इतर सर्व दिवशी ही रेल्वे धावणार आहे. सध्या आनंदनगर रेल्वे स्थानकात ही रेल्वे आहे. खुल्या निविदेच्या प्रक्रियेनंतर ती खासगी कंपनीकडे देण्यात येणार आहे.

इंडियन रेल्वे केटरिंग आणि टुरिंझग कॉर्पोरेशनकडे (आयआरटीसी) या रेल्वेचा ताबा असणार आहे. यामध्ये भाड्याचे पैसे घेणे इत्यादी कामे आयआरएफसीकडे असणार आहेत. खासगी क्षेत्राला दोन रेल्वे प्रायोगिकतत्वावर देणार आहेत. १०० दिवसांत ही प्रक्रिया सुरू होणार आहे. जास्तीत जास्त वाहतूक असेल आणि महत्त्वाच्या पर्यटनस्थळांना जोडण्यात येतील असा रेल्वे मार्ग निवडण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले.

रेल्वे कर्मचारी संघटनांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध केला आहे. देशात मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्याचा संघटनांनी इशारा दिला आहे. प्रवाशांसाठी तेजस एक्स्प्रेसमध्ये खास सुविधा असणार आहेत. एलसीडी एंटरटेनमेंट, माहिती देणारे स्क्रीन्स, वायफाय सुविधा, आरामदायी आसन व्यवस्था रेल्वेमध्ये असणार आहे. याशिवाय वाचनासाठी वैयक्तिक लाईट सुविधा, मॉड्युलर बायोटॉयलेट्स आणि सेन्सरवर चालणारी नळ सुविधा असणार आहेत.

Leave a Comment