“दिसतो आहे फरक, शिवशाही परत’ हे ब्रीद वाक्‍य घेऊन भाजपची यात्रा


औरंगाबाद – देशातील जनतेने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा केंद्रातील मोदी सरकार आणि त्यांनी केलेल्या विकासकामांवर विश्‍वास दाखवला आहे. राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारवर असाच विश्‍वास जनता दाखवेल आणि राज्यात विधानसभेच्या 220 जागा जिंकून पुन्हा युतीचेच सरकार येणार, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.

येत्या 14 जुलै ते 10 ऑगस्ट दरम्यान राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली “दिसतो आहे फरक, शिवशाही परत’ हे ब्रीद वाक्‍य घेऊन यात्रा काढण्यात येणार आहे. रावसाहेब दानवे यांनी त्या निमित्ताने औरंगाबादेत पत्रकारांशी संवाद साधला. दानवे म्हणाले, देशातील जनतेने मोदींच्या सबका साथ सबका विकासवर शिक्कामोर्तब करत भाजपचे 303 खासदार निवडून दिले. येत्या विधानसभेला देखील हीच परिस्थिती असेल. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली युती सरकारने सर्वांगीण विकास केल्याने आम्ही यावेळी 220 जागा जिंकू आणि राज्यात पुन्हा युतीचेच सरकार आणू, असा विश्‍वास आम्हाला असल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

भाजपमध्ये अनेकजण आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रवेश करत आहेत, त्याबद्दल त्यांनी जो येईल त्याला आम्ही भाजपमध्ये घेणार, असे सांगितले. दानवे पक्षाचे ज्येष्ठ नेते माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी विधीमंडळाच्या शेवटच्या दिवशी सभागृहात केलेल्या भाषणाचा संदर्भ देत म्हणाले, खडसे आमचे नेते आहेत, विरोधकांकडून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला होता. त्यांच्यावरील सगळ्या आरोपांची चौकशी सुरू आहे. पक्षात आजही त्यांना मानाचे स्थान आहे.

Leave a Comment