व्हायरल सत्य; व्हॉट्सअॅप सुरु ठेवण्यासाठी द्यावे लागतील 499 रुपये


सध्याच्या घडीला अनेक लोकांच्या दैनंदिन आयुष्याचा सोशल मीडिया हा अविभाज्य भाग बनला असून फेसबुक आणि व्हॉट्सअॅपपासून अनेक इतर मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून अनेक मेसेज एकमेकांना फॉरवर्ड केले जातात. त्यातच आता काल सोशल मीडियावर व्हॉट्सअॅप संदर्भातील एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दररोज रात्री 11.30 वाजल्यापासून सकाळी 6 पर्यंत व्हॉट्सअप बंद राहणार असल्याचे यात सांगण्यात येत आहे. तसेच आपल्या संपर्क यादीतील लोकांना संबंधित मेसेज 48 तासात फॉरवर्ड केला नाही, तर तुमचे खाते बंद होईल. त्याचबरोबर तुम्हाला तुमचे व्हॉट्सअॅप खाते सुरु ठेवायचे असेल तर 499 रुपये शुल्क द्यावे लागेल, असेही सांगण्यात येत आहे.

अनेक युजर्स व्हॉट्सअपवर फिरणाऱ्या या मेसेजमधील या दाव्याने बुचकळ्यात पडले आहेत. त्यातील काहींनी धोका पत्करायला नको म्हणून हे मेसेज पुढे पाठवायलाही सुरुवात केली आहे. या मेसेजमध्ये, यापुढे भारतात रात्री 11.30 वाजल्यापासून सकाळी 6 पर्यंत व्हॉट्सअॅपचा वापर करता येणार नाही. व्हॉट्सअॅप या वेळेत पूर्णपणे बंद असेल. व्हॉट्सअॅपच्या वापराबाबत लवकरच एक नवा कायदा मोदी सरकार आणणार आहे. 48 तासात हा मेसेज आपल्या संपर्क यादीतील 10 लोकांना फॉरवर्ड केला नाही, तर तुमचे खाते बंद होईल. हे बंद खाते सुरु ठेवण्यासाठी 499 रुपये द्यावे लागतील, असे म्हटले आहे

अशा प्रकारची कोणतीही अधिकृत सुचना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने दिलेली नाही. तसेच याची कोणत्याही सोशल मीडिया कंपनीने अधिकृत घोषणा केलेली नाही. संबंधित दावा पूर्णपणे खोटा असून संबंधित मेसेज पुढे फॉरवर्ड केला नाही तर तुमचे व्हॉट्सअप बंद होईल आणि पुन्हा सुरु करण्यासाठी पैसे द्यावे लागतील, अशी कोणतीही भिती बाळगण्याचे कारण नसल्याचे म्हटले आहे.

व्हॉट्सअॅप, फेसबूक आणि इंस्टाग्रामची सेवा 9 तासांसाठी बुधवारी ठप्प झाली होती. व्हॉट्सअॅप युजर्सला या काळात फोटो अपलोड किंवा डाऊनलोड करण्यात अडथळे येत होते. याचाच फायदा उठवत संबंधित खोटा मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आला. दरम्यान, आपल्या सर्व ग्राहकांना मेसेज पाठवत एअरटेल कंपनीने असे अडथळे आले होते आणि आता ते दूर करण्यात आल्याचे अधिकृतपणे कळवले आहे.

Leave a Comment