केंद्रीय मंत्र्यांना आता चहासोबत मिळणार अक्रोड, बदाम, खजूर, भाजलेले चणे


नवी दिल्ली : गेल्या अनेक वर्षांपासून गरम गरम चहा आणि बिस्कीट याचे वेगळे नाते बनले आहे. चहा आणि बिस्कीट हाच सकाळचा नाश्ता आपल्यापैकी अनेकांसाठी असतो. पण आता केंद्रीय मंत्र्यांना याच चहा आणि बिस्कीटांच्या नाश्त्यासाठी मुकावे लागणार आहे. कारण आता चहासोबत बिस्कीटाऐवजी केंद्रीय मंत्र्यांना चक्क अक्रोड, बदाम, खजूर, भाजलेले चणे यांसारखे हेल्दी स्नॅक्स मिळणार आहेत. याबाबतचे परिपत्रक खुद्द केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काढले आहे.

या परिपत्रकानुसार, मंत्रायलयातील कॅन्टीनमध्ये येत्या काही दिवसांपासून बिस्कीट मिळणार नाही, कारण बिस्कीटच कॅन्टीनमधून हद्दपार करण्यात येणार आहे. पण बिस्कीटांऐवजी आता कॅटीनमध्ये अक्रोड, बदाम, खजूर, भाजलेले चणे यांसारखे हेल्दी स्नॅक्स ठेवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे आता हेच हेल्दी पदार्थ मंत्र्यांना चहासोबत देण्यात येणार असल्याचेही या परिपत्रकात म्हटले आहे.

या निर्णयाला केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी हिरवा झेंडा दाखवला आहे. सर्व मंत्र्यांनी आरोग्य मंत्रालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. दिवसभर विविध कामात सर्व मंत्री व्यस्त असतात. त्यामुळे स्वत:च्या फिटनेसकडे लक्ष देण्यास त्यांना वेळ मिळत नाही. म्हणून पौष्टीक खाद्य पदार्थ खावेत यासाठी हा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या या निर्णयामुळे यापुढे मंत्र्यांना चहासोबत पौष्टीक नाश्ता मिळणार आहे. केंद्रीय मंत्र्यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे.

अक्रोड, बदाम यासारख्या सुखामेव्यात फायबर, विटॅमिन्स, मिनरल्स यांचे प्रमाण भरपूर असते. तसेच अँटिऑक्सीडेंटही भरपूर प्रमाणात असते. तर खजूर हे आरोग्यवर्धक असते, त्यामुळे आरोग्य मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. याशिवाय केंद्रीय मंत्रालयाने फक्त आरोग्यदायी खाद्यच नाही तर प्लास्टिक बंद करण्याकडेही भर दिला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने प्रत्येक विभागातील प्लास्टिक कप हद्दपार केले आहेत. तसेच यापुढे प्रत्येक विभागात काचेची ग्लास वापरण्याचे आदेश दिले आहेत. तसेच प्लास्टिकच्या बाटल्याही बंद करण्याचे विभागाने ठरवले आहेत.

Leave a Comment