वंचितला विधानसभेसाठी सोबत घेण्यावर होणार चर्चा – अशोक चव्हाण


नाशिक – लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसच्या दृष्टीने विधानसभा निवडणूक महत्त्वाची असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याबाबत चर्चा करणार आहोत. या चर्चेची जबाबदारी माणिकराव ठाकरे यांच्यावर सोपवली असल्याची माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.

त्याचबरोबर मनसेला सोबत घेण्यासंदर्भातील प्रस्ताव येत असून त्याबाबत अजून काही निर्णय घेण्यात आला नाही. काँग्रेसमध्ये मनसेला घेण्याबाबत काही मतभेद असल्याचे चव्हाण म्हणाले. समविचारी पक्षांशी आगामी निवडणुकीसाठी आघाडी करण्याआधी जिल्हाध्यक्षांना विश्वासात घेऊन त्यांचे म्हणणे ऐकण्यात आले आहे. यावेळी नवीन चेहऱ्यांना, तरुण तसेच महिलांना संधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यभरातून ७ जुलैपर्यंत इच्छुकांचे अर्ज मागवले जाणार आहेत. राष्ट्रवादी बरोबर आघाडी करण्यासाठी केंद्रीय नेतृत्वाने निर्णय घेतला आहे. ८ दिवसात जागा निश्चित होतील, असे ते म्हणाले.

निवडणूक झाल्यानंतर हवा येते तशी जाते, हे कळेल कोणाची हवा आहे. ५० पेक्षा जास्त विरोधकांचे उमेदवार निवडून येणार नाहीत, असे गिरीश महाजनांनी सांगितले. पण त्यांचे असे सांगणे म्हणजे सर्व काही फिक्स असल्याचे म्हणत चव्हाण यांनी भाजपवर टीका केली. महाजनांनी मतपत्रिकेचा वापर करणार, की नाही याबाबत बोलावे. भाजपकडून साम-दाम-दंड-भेद याचा वापर केला जात आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

Leave a Comment