पाकिटबंद खाद्यपदार्थांसाठी FSSAIचे कडक निर्बंध


मुंबई : लवकरच देशात विकल्या जाणाऱ्या पाकिटबंद खाद्यपदार्थांचे पॅकिंग बदलणार आहे. यासाठी नवा ड्राफ्ट तयार करून त्यासाठी फूड सेफ्टी अँड अ‍ॅथोरिटी ऑफ इंडियाने (FSSAI) नियम जारी केला आहे. त्यानुसार आता पाकिटबंद खाद्यपदार्थ विकणाऱ्या कंपन्यांना पॅकेटवर लाल रंगाचा स्ट्रिकर लावून पदार्थांमध्ये किती फॅट,साखर आणि मीठ आहे हे सांगावे लागणार आहे.

याबाबत माहिती देताना FSSAI ने सांगितले की पाकिटबंद खाद्यपदार्थांमध्ये काय काय वापरले आहे, यात कुठले पदार्थ आहेत हे ग्राहकांना सांगावे लागेल. ग्राहकांना आपण खरेदी करत असलेल्या पदार्थामध्ये काय आहे, हे कळणे हा त्यांचा हक्क आहे. नवे नियम 3 वर्षांमध्ये टप्प्यात लागू करणार आहे.

डायबेटिस आणि जाडेपणा देशात दिवसेंदिवस वाढत आहे. सरकारने यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन वर्षांपूर्वीपासूनच नियमांमध्ये बदल करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे आता पाकिटबंद खाद्यपदार्थांमध्ये किती मीठ आहे, किती साखर आहे, किती फॅट आहे हे सांगावे लागेल. या नियमाशी संबंधित ज्या कंपनी आहेत त्यांच्याकडून सुधारणांबद्दल प्रस्ताव FSSAI ने मागवले आहेत. एक महिन्यात हे प्रस्ताव पाठवायला सांगितले आहेत. त्याप्रमाणे विचार करून नियमांना अंतिम रूप दिले जाईल.

लहान मुलांच्या आरोग्याचा विचार करत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणचे ( FSSAI )सीईओ मयंक अग्रवाल यांनी जंक फूडच्या जाहिरातींवर बंदी घालण्याच्या प्रस्तावावर विचार केला असल्याचे स्कूल हेल्थकेअरवर झालेल्या एसोचॅमच्या संमेलनात सांगितले. मुले जंक फूड आणि साॅफ्ट ड्रिंकचा जास्त वापर केल्याने जाडी होतातच, शिवाय इतर गंभीर आजारांनाही तोंड द्यावे लागते. खाण्याच्या या संस्कृतीमुळेच छोट्यांमध्ये डायबेटिस आणि हृदय रोगाचे प्रमाण वाढत आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते हे असेच राहिले तर 2030पर्यंत प्रत्येक तीन व्यक्तींपैकी एक व्यक्ती जाडा असेल.

Leave a Comment