ईव्हीएम यंत्रणा म्हणजे देशाच्या व्यवस्थेला लागलेली कीड – उदयनराजे


सातारा – सातारा येथील पत्रकार परिषदेत लोकशाही ईव्हीएम मशीनमुळे धोक्यात आली असल्याचे म्हणत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ईव्हीएम ही यंत्रणा म्हणजे देशाच्या व्यवस्थेला लागलेली कीड असून ती उखडून फेकायला हवी, असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, त्यांनी ईव्हीएम मशीनवरून होणार्‍या निवडणुकांना जोरदार आक्षेप घेतला.

मला सातारा लोकसभा मतदारसंघात खात्रीलायक साडेतीन ते पावणे चार लाखाचे मताधिक्य असल्याचे दावा देखील उदयनराजे भोसले यांनी यावेळी केला. मी राजीनामा देतो तुम्ही पुन्हा मतदान घ्या, तेव्हापण मी तितक्याच मताधिक्कयाने निवडून येईल, असे म्हणत त्यांनी निवडणूक आयोगाला बॅलेट पेपरद्वारे फेरनिवडणूक घेण्याची तयारी आहे का? असा सवाल केला आहे.

देशभरातील लोकसभा निवडणुकी दरम्यान मतदारसंघामध्ये ईव्हीएम मशीनमधील आकडेवारीत घोळ झाला आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघनिहाय झालेले मतदान आणि मतमोजणी यांच्यामध्ये फरक दिसून येत आहे. ईव्हीएम मशीनमध्ये गडबडी झाल्याचा आरोप करत मी आत्ता राजीनामा देतो. या मतदारसंघात बॅलेट पेपरवर फेरमतदान घ्या, असे खुले आव्हान उदयनराजे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले.

या विषयावर सर्वोच्च न्यायालयाने अधिकाराने भाष्य करायला हवे, पण या विषयावर दाद मागणार्‍यावरच कारवाईची भाषा वापरली जाते, हे चुकीचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. उदयनराजे कधी रडीचा डाव खेळत नाही, लोकशाहीचा गळा घोटणार्‍या या यंत्रणेपेक्षा राजेशाही काय वाईट होती? या प्रकाराला वेळीच पायबंद घातला नाही तर १८५७ च्या बंडाप्रमाणे सर्वत्र रक्तपात होऊन सारी व्यवस्था नष्ट होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.

मी एका निवडणुकीत पडलो तरीसुध्दा रडलो नाही. आता तर मी विजयी झालो आहे. मी रडीचा डाव खेळत नाही. देशभरात ३७६ मतदारसंघात घोळ झाल्याचा संशय आहे. आयोगाने पोर्टलवरून आकडेवारी हटवल्याने संशय आणखीनच वाढला आहे. आम्ही म्हणेल तोच कायदा आणि मशिनमध्ये व्हायरस शिरला असे म्हणतात. न्यायालयात जावे तरी न्यायालय तक्रारदारालाच बंधने घालत आहे. माझ्या सातारा मतदारसंघात आता आकडेवारीत घोळ आहे, न्यायदेवता आता काय करणार ? सरळ चिट्ठ्या टाकून लोकप्रतिनिधींची निवड करा, कशाला निवडणुकीवर खर्च करता, असे म्हणत उदयनराजेंनी ईव्हीएम मशीनवर निशाना साधला.

Leave a Comment