आदल्या रात्री घोषित केले मृत आणि दुसऱ्या दिवशी जिवंत


नवी दिल्ली – नुकताच पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याचा विषय शांत झाला असतानाच डॉक्टरांच्या निष्काळजीपणाचे धक्कादायक प्रकरण मध्य प्रदेशात समोर आले आहे. गुरुवारी रात्री मृत घोषित केलेली व्यक्ती पोस्ट मॉर्टेमसाठी नेताना शुक्रवारी सकाळी जिवंत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली. लगेचच या वृद्ध व्यक्तीवर पुन्हा उपचार सुरू करण्यात आले. पण त्याचा काडीमात्र उपयोग झाला नाही. कारण त्या रुग्णाला वेळीच उपचार मिळाले असते, तर त्याचा जीव कदाचित वाचला असता.

मध्य प्रदेशमधील हॉस्पिटलमध्ये ७२ वर्षीय किशन काशीराम या इसमाचा मृत्यू झाल्याची माहिती डॉ. अविनाश सक्सेना यांनी गुरुवारी रात्री ९ वाजता पोलिसांना कळवली होती. त्यानुसार, पोलीस शुक्रवारी सकाळी शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. वृद्धाचा श्वासोच्छवास सुरू असल्याचे त्यावेळी त्यांच्या लक्षात आले. तेवढ्यात तो रुग्ण जागा झाला आणि रडू लागला. डॉक्टरांची हे पाहून धावाधाव झाली. तातडीने त्यांनी सलाईन लावून त्याच्यावर उपचार सुरू केले, पण काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.

हॉस्पिटलमध्ये किशन काशीराम हे एकटेच दाखल झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल काही माहिती मिळू शकलेली नाही. पण या प्रकरणाची गंभीर दखल रुग्णालय प्रशासनाने घेतली असून, निष्काळजीपणा डॉक्टरांकडून झाल्याचे मान्य केले आहे. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आर एस रोशन यांनी संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.

Leave a Comment