‘या’ पाच ठिकाणचे निसर्ग सौंदर्य पावसाळ्यात असते पाहण्यासारखे


उन्हाळा संपला असून आता अवघ्या काही दिवसातच मॉन्सून सक्रिय होईल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला जात आहे. आता आपल्यापैकी अनेकांना पावसाळी पिकनिकचे वेध लागले असतीलच, पण आता नेमके जायचे कुठे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर आम्ही आज तुम्हाला पुणे आणि मुंबईजवळ असलेल्या पावसलाली पर्यटनस्थळांबाबत सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात कोणती आहे ती ठिकाणे

मुंबईपासून 150 किमी अंतरावर असलेल्या पुणे जिल्ह्यातील माळशेज घाटाचे सौंदर्य पावसाळ्यात अगदी पाहण्यासारखे असते. येथील वळणदार घाटात पर्यटक दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या संख्येने गर्दी करतात. पण या ठिकाणी जाण्याआधी तुम्हाला घाटातील परिस्थिती तुम्हाला जाणून घ्यावी. कारण दरवर्षी या घाटात लहानमोठी दरडी कोसळत असतात. त्यामुळे येथे जाण्याआधी माहिती घेतलेली बरी.

दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या संख्येने पर्यटक पुणे-मुंबई दरम्यान असलेल्या लोणावळा आणि खंडाळा घाटातील निसर्ग सौंदर्य न्याहाळण्यासाठी येतात. लोणावळा आणि खंडाळ्यात हिरव्यागार डोंगर रांगा, त्यातून वाहणारे धबधबे, डोंगरमाथ्यावर जमा होणारी धुक्याची चादर हा निसर्गाचा नजराणा पाहायला मिळतो. इतिहासाची साक्ष देणारे गड-किल्लेसुद्धा या भागात असल्याने येथील परिसर पर्टकांना नेहमी आपल्याकडे खुणावत असतो.

अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील भडारदरा येथील ‘काजवा महोत्सव’ हा पर्यटकांना नेहमीच भुरळ घालतो. निसर्गरम्य वातावरण अनुभवायचे असेल पर्यटकांनी पावसाळ्यात भंडारदऱ्याला भेट द्यालाच हवी. भंडारदरा (शेंडी) हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले आहे. ते निसर्गसौंदर्याने नटलेले स्थान असून अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे इथल्या मूळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात. भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा हे पर्यटकांचे येथील मुख्य आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. भंडारदरा परिसरातच कळसूबाई हे महाराष्ट्रातील सह्याद्रीचे सर्वाधिक उंच शिखर असून समुद्रसपाटीपासून त्याची उंची सुमारे १६४६ मीटर आहे. शिखरावर कळसुबाई देवीचे मंदीर आहे.

महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून साताऱा जिल्ह्यातील महाबळेश्वरची ओळख आहे. महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण आहे. तसेच महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या पर्वत रांगांवर समुद्र सपाटीपासून सुमारे ४५०० फुट उंचीवर वसलेले आहे. महाबळेश्वरला जुन्या मुंबई प्रांताची उन्हाळ्यातील राजधानी म्हणूनच संबोधले जात होते. भाम्बावली वझराई धबधबा हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. या धबधबाची उंची 1840 फूट (560 मीटर) आहे आणि तो सरळ उभ्या दगडावरून वाहतो आणि ह्याला तीन पायऱ्या आहेत. उरमोडी नदी ही या धबधब्याचा उगम स्थान आहे. कोयना, कृष्णा, वेण्णा, गोवित्री आणि सावित्री या पाच नद्यांचा उगम याच भागात आहे.

बेळगांव आणि गोव्याला जोडणारा रस्ता म्हणजेच आंबोलीचा घाट. पर्यटकांना सतत आव्हान देणारे असे हे आंबोली सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक आहे. आंबोली घाटातून प्रवास करताना निसर्ग पर्यटनाचा आस्वाद पर्यटक मनमुराद घेत असतात. आकाशाशी स्पर्धा करणार्‍या टेकड्या, बाराही महिने हिरव्यागार असणार्‍या दर्‍या. पावसाळ्याच्या दिवसात तर या दर्‍या अधिकच सुंदर दिसतात. ओबोलीचे मुंबईपासूनच अंतर 549 कि.मी असून, पुणे- आजरा- आंबोली हे अंतर 390 कि.मी. तर रत्नागिरी- आंबोली 215 कि. मी. आहे.

Leave a Comment