या दिवशी प्रदर्शित होणार ‘लागिरं झाले जी’ मालिकेचा शेवटचा भाग!


महाराष्ट्रातील घराघरात झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय ‘लागिरं झालं जी’ मालिकेचा चाहता आहे. अल्पावधीतच आज्या आणि शितलीची प्रेमकहाणी लोकप्रिय ठरली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चांदवडी हे गाव पोहोचले. गावात मालिकेतील आपले लाडके कलाकार आज्या, शितली, राहुल्या, भैय्यासाहेब यांची एक झलक बघण्यासाठी गर्दी होऊ लागली. पण आता लागिरं झाले जी ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचा शेवटचा भाग येत्या 22 जून रोजी प्रसारित होणार आहे. मिसेस मुख्यमंत्री ही नवी मालिका या मालिकेच्या जागी सुरु होणार आहे.

महाराष्ट्रातील रसिकांनी लष्करात असलेला आज्या आणि साधीसरळ शितली यांच्यात उमलणारी हळूवार प्रेमकथा चांगलीच डोक्यावर घेतल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राने आज्या आणि शितलीचा विवाहसोहळा अनुभवला. या मालिकेमुळे अभिनेत्री शिवानी बावकर, नितिश चव्हाण, राहुल मगदूम, निखिल चव्हाण हे सगळे कलाकार चांगलेच प्रकाशझोतात आले. विशेष म्हणजे चांदवडी या पुनर्वसित गावातील लोकांना या मालिकेमुळे रोजगार मिळाला आणि गाव प्रकाशझोतात आले. पण अडीच वर्षांपूर्वी सुरु झालेला हा संस्मरणीय प्रवास अखेर थांबत आहे. मालिकेचा शेवट कसा होणार याची उत्सुकता आता सगळ्यांनाच लागली आहे. आपल्या लाडक्या आज्या-शितलीला प्रेक्षक मिस करतील हे मात्र नक्की!

Leave a Comment