भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा प्रशिक्षकपदाचा करार ४५ दिवसांनी वाढवला असून त्याचबरोबर त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांनाही मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे. रवी शास्त्री यांची २०१७ साली टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा करार २०१९ विश्वचषकापर्यंत करण्यात आला होता. पण विश्वचषकानंतर भारतीय संघाचे व्यस्त वेळापत्रक लक्षात घेता शास्त्री आणि त्यांच्या टीमला मुदतवाढ जाहीर करण्यात आली आहे.
शास्त्री बुवांच्या प्रशिक्षकपदाला बीसीसीआयकडून मुदतवाढ
हा निर्णय बीसीसीआयच्या क्रिकेट प्रशासकीय समितीने घेतला आहे. विश्वचषकानंतर विंडीज दौऱ्यामध्ये रवी शास्त्री यांच्यासोबत सहायक प्रशिक्षक संजय बांगर, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर.श्रीधर भारतीय संघासोबत असणार आहे. भारतीय संघ विश्वचषकानंतर १५ दिवसांनी विंडीज दौऱ्यावर रवाना होणार आहे. भारत या दौऱ्यात आपल्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा पहिला सामना खेळेल.