ईएसआयअंतर्गत कमी खर्चात कर्मचाऱ्यांना मिळणार विमा सुरक्षा


नवी दिल्ली – ईएसआय अॅक्टअंतर्गत कंपन्या तसेच, कर्मचाऱ्यांकडून विमा सुरक्षेसाठी घेतल्या जाणाऱ्या रकमेची टक्केवारी केंद्र सरकारने कमी केल्यामुळे या विम्याअंतर्गत कर्मचाऱ्यांना याआधी दिल्या जाणाऱ्या सुविधा आता कमी खर्चात उपलब्ध होणार आहेत. १ जुलै २०१९ पासून हा नवा नियम लागू होणार आहे.

याआधी कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या ६.५ टक्के रक्कम कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या विमा सुरक्षेसाठी ईएसआय अॅक्टअंतर्गत भरावी लागत होती. यापैकी कंपन्या किंवा संस्थांकडून ४.७५ टक्के रक्कम दर महिन्याला भरणे आवश्यक होते. तर, कर्मचाऱ्यांच्या पगारातूनही १.७५ टक्के रक्कम दर महिन्याला कापून जात असे. १५ हजार रुपयांपर्यंत मासिक वेतन असणाऱ्यांना ही सुविधा दिली जात असे. १ जानेवारी १९९७ पासून हा नियम अंमलात आला होता.

ईएसआय अॅक्टअंतर्गत नव्या नियमानुसार, कंपन्या किंवा संस्थांकडून भराव्या लागणाऱ्या रकमेची टक्केवारी घटवून ४.७५ वरून ३.२५वर आणण्यात आली आहे. तर, कर्मचाऱ्यांनी भरावयाच्या भागाची टक्केवारी १.७५ वरून घटवून ०.७५ टक्क्यांवर आणण्यात आली आहे. तसेच, कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनाची मर्यादा वाढवून २१ हजार करण्यात आली आहे. यामुळे अधिकाधिक कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणे शक्य होणार आहे. १ जुलै २०१९ पासून हा नवा नियम लागू होणार आहे.

Leave a Comment