मुंबई – मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सलग ३०० मिमी किंवा त्याहून अधिक पाऊस पडल्यास मुंबईत पाणी तुंबण्याची शक्यता व्यक्त केली आहे. अशी शक्यता व्यक्त करतानाच महापौरांनी मुंबईत पाणी तुंबल्यास पाण्याचा तातडीने निचरा करण्याच्या उपाययोजनाही मुंबई महापालिकेनेही तत्पर ठेवल्या आहेत, अशी कबुली दिली.
महापालिकेने मुंबईत पाणी भरण्याची २३७ ठिकाणे निश्चित केली असून पाण्याचा निचारा करण्याची व्यवस्था त्याठिकाणी करण्यात आल्याचे महापौरांनी सांगितले. यंदाच्या पावसाळ्यात मुंबई अपूर्ण नालेसफाई, ठिकठिकाणी सुरू असलेली रस्त्यांची आणि मेट्रोची कामे यामुळे पाण्यात जाण्याची भीती विरोधकांकडून व्यक्त होत आहे. त्यातच शहर व उपनगरात पाणी भरण्याची सुमारे २२५ ठिकाणे असून त्यात ४३ नवीन ठिकाणांची भर पडली आहे. फ्लडिंग पॉइंट म्हणून १८० ठिकाणे वर्तविण्यात आली आहेत. हे भाग थोड्या पावसातच जलमय होणार आहेत. यामध्ये माटुंगा, मालाड, भांडुपमधील सर्वाधिक ठिकाणे आहेत.
महापालिका दरवर्षी पाणी तुंबू नये यासाठी नालेसफाई, मॅनहोल सफाई आणि दुरुस्ती, पर्जन्य जलवाहिन्यांची साफसफाई, पाणी तुंबण्याची शक्यता असलेल्या ठिकाणची अतिक्रमणे हटविणे, तसेच पम्पिंग स्टेशन सज्ज ठेवणे अशी कामे करते. शहर आणि उपनगरातील विविध भागात त्यानंतरही पाणी तुंबते आणि महापालिका प्रशासन टीकेचे धनी होत असल्यामुळे पालिकेची सर्व यंत्रणा दरवर्षी पावसाळ्यात कामाला लागते. यंदाही मागील दोन महिन्यांपासून पर्जन्य जलवाहिन्या विभाग, विद्युत आणि देखभाल विभागासह संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा रस्त्यावर उतरून काम करत आहे.
यंदा मागील वर्षी पाणी तुंबलेल्या ठिकाणी पाणी तुंबू नये, ठोस उपाययोजना यासाठी केल्या जात आहेत. पालिकेकडून नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. ३१ मेची मुदत टळली तरीही बंदिस्त नाल्यांची सफाई अद्यापही चालू आहे. पम्पिंग स्टेशन सात ठिकाणी उभारण्यात आली आहेत. तसेच सुमारे २५० ठिकाणी पंप बसवण्यात आले आहेत. पण महापौर ही कामे होत असली तरी पाणी साचणार नाही याबाबत खात्रीशीर सांगू शकत नाहीत. त्यांनी काही दिवसांपूर्वीच नालेसफाईबाबत असमाधानी असल्याचे वक्तव्य केल्यामुळेच आताही त्यांनी सलग ३०० मिमी किंवा त्याहून अधिक पाऊस झाल्यास पाणी तुंबेल, अशी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.