प्रसिद्ध नाटककार आणि ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांचे निधन


मुंबई – बंगळुरु येथे प्रसिद्ध नाटककार आणि ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांचे निधन झाले आहे. ते ८१ वर्षांचे होते. १९ मे १९३८ साली माथेरान येथे गिरीश यांचा जन्म झाला होता. पुणे येथे त्यांचे शिक्षण झाले होते. त्यांनी पुढे नाट्यक्षेत्रात स्वत:ला झोकून दिले. त्यांच्या नाटकांनी भारतासह विदेशातही बरेच नाव कमावले आहे.

गिरीश यांनी लिहिलेले ‘युवती’ (१९६१) हे पहिले नाटक होते. त्यांनतर त्यांचे ‘तुघलक’ (१९६४) हे नाटक देखील गाजले होते. बऱ्याच नाटकांचे लिखाणही त्यांनी केले आहे. १९७० मध्ये त्यांनी कन्नड चित्रपट ‘संस्कार’ मधून चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले होते. त्यांनी चित्रपट दिग्दर्शक म्हणून ‘वंशवृक्ष’ चित्रपटाद्वारे सुरुवात केली. बरेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार या चित्रपटाला मिळाले.

त्यांनी बॉलिवूडच्याही बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे. सलमान खानच्या ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’, सुशांत सिंगच्या ‘एम.एस.धोनी’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिका स्मरणीय ठरल्या. साहित्यातील सर्वोत्कृष्ठ ज्ञानपीठ पुरस्कारानेही गिरीश यांना १९९९ साली सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना पद्मश्री (१९७४) आणि पद्मभूषण (१९९२) पुरस्काराने गौरविण्यात आले होते. गिरीश यांचे ‘अडाडता आयुष्य’ (खेळता खेळता आयुष्य) हे आत्मचरित्र देखील आहे.

भारतीय चित्रपट आणि रंगभूमीच्या एका महान युगाचा त्यांच्या निधनाने शेवट झाला आहे. सिनेसृष्टीतील त्यांची पोकळी कधीही न भरुन निघण्यासारखी आहे. त्यांच्या जाण्याने कलाक्षेत्रात शोक व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment