
मुंबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अनेक वर्षांच्या झंझावाती कारकिर्दीनंतर भारताचा सिक्सर किंग अर्थात क्रिकेटपटू युवराज सिंहेने निवृत्तीची घोषणा केली. त्याने आपली निवृत्ती मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केली. दरम्यान, त्याने यावेळी भावूक होत ही वेळ माझ्यासाठी महत्त्वाची आणि कठीण असल्याचे सांगितले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सिक्सर किंगची निवृत्ती
मी क्रिकेटकडूनच कधीही हार मानायची नाही, खाली पडलो तरी धूळ झटकत पुन्हा उभारी घ्यायची ही वृत्ती शिकलो असे तो म्हणाला. माझ्या वडिलांचे स्वप्न होते की मी विश्वचषक स्पर्धा खेळावी आणि तो जिंकावा, मी त्यांचे ते स्वप्न पूर्ण केले आणि तो आजही माझ्या सगळ्यात आठवणीतला क्षण असल्याचे युवराज म्हणाला. भारताने 2011 मध्ये विश्वचषक जिंकला युवराज सिंह त्यावेळी मॅन ऑफ दी सीरिज होता. तसेच त्याला चार सामन्यांमध्ये मॅन ऑफ दी मॅचनेही गौरवण्यात आले होते. कॅन्सरने आपल्याला यशाच्या शिखरावर असताना गाठले आणि कारकिर्द संपुष्टात येते की काय असा प्रसंग आल्याचे तो म्हणाला. पण डॉक्टरांची मेहनत आणि कुटुंबीयांचे व चाहत्यांचे प्रेम यांच्या जीवावर आपण त्यावर मात केल्याचे तो म्हणाला.
