भाजपला फक्त प्रादेशिक पक्षच हरवू शकतात – ओवेसी


हैदराबाद – काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा वायनाडमध्ये विजय झाला कारण 40 टक्के मुस्लिम मतदार त्याठिकाणी आहेत. मुस्लिमांसाठी देशात जागा हवी पण कोणाची भीक मुस्लिम समाजाला नको अशी टीका एमआयएमचे अध्यक्ष असउद्दीन ओवेसी यांनी केली आहे.

खासदार ओवेसी यांनी तेलंगणा येथे जनसभेला संबोधित करताना सांगितले की, भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र झाला त्या दिवशी आमच्या पूर्वजांनी विचार केला असेल की हा नवा भारत आहे. गांधी, नेहरू, आंबेडकर आणि कोट्यावधी लोकांचा हा भारत असेल. अजूनही मला अपेक्षा आहे की, देशातील मुस्लिमांना त्यांचा हक्क मिळेल. आम्हाला भीक नको आम्हाला आमचे हक्क हवेत असे ओवेसी यांनी सांगितले.

ताकद, विचार आणि कठोर मेहनत घेण्याची काँग्रेसला इच्छा नाही. भाजप देशभरात कुठे हरली असेल तर ती पंजाबमध्ये ज्याठिकाणी शिख आहेत. भाजप अनेक प्रादेशिक पक्षांमुळे हरली आहे. काँग्रेसने भाजपला हरवले नसल्याची टीका ओवेसी यांनी काँग्रेसवर केली आहे. तसेच अमेठीसारख्या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष पराभूत झाले आणि वायनाड येथून निवडून आले. कारण त्याठिकाणी 40 टक्के मुस्लिम आहेत.

Leave a Comment