विराट कोहलीला पिण्याच्या पाण्याने गाडी धुतल्याबद्दल पाचशे रुपयांचा दंड


मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला पिण्याच्या पाण्याने गाडी धुतल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. कोहलीला गुरुग्राम महापालिकेने पाचशे रुपयांचा दंड केला आहे. गाड्या धुण्यासाठी कोहलीच्या गुरुग्राममधील निवासस्थानी काम करणारे कर्मचारी पिण्याच्या पाण्याची नासाडी करत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी केली होती.

विराट कोहलीचे गुरुग्राममधील डीएलएफ फेज 1 मध्ये घर आहे. कोहलीच्या घराबाहेर मालकीच्या सहा गाड्या उभ्या असतात. कोहलीचे कर्मचारी या गाड्या धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरत असल्याची तक्रार त्याच्या शेजाऱ्यांनी दिली होती. गुरुग्राम महापालिकेने तक्रारीत तथ्य आढळल्यामुळे कोहलीच्या स्टाफकडून पाचशे रुपयांचा दंड वसूल केला.

उत्तर भारतामध्ये उष्णतेची मोठी लाट पसरली असल्यामुळेच पिण्याच्या पाण्याचाही तुटवडा या भागात जाणवतो. अशा परिस्थितीत गाड्या धुण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची नासाडी करणे बेजबाबदारीपणाचे लक्षण आहे. त्यातच हे पाणी पिण्याचे असल्यामुळे आणखी संताप व्यक्त होत आहे.

सध्या टीम इंडिया इंग्लंडमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात विश्वचषक खेळत आहे. कोहलीचा व्याप पाहता, त्याच्या अनुपस्थितीत त्याचे कर्मचारी कोणते पाणी कशासाठी वापरतात, याकडे लक्ष देणे त्याला किंवा पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मालाही शक्य नसेल्यामुळे कोहलीला नावे ठेवण्याऐवजी त्याच्या कर्मचाऱ्यांनाच समन्स बजावणे सयुक्तिक ठरेल.

Leave a Comment