सलमानच्या ‘भारत’ची सत्तरी पार


ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला सलमान खानचा ‘भारत’ चित्रपट आला असून पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने बॉक्स ऑफिस गाजवायला सुरुवात केली आहे. ‘भारत’ने पहिल्याच दिवशी सर्व चित्रपटांचा रेकॉर्ड पार करत ४२.०३ कोटीची कमाई केली. तर दुसऱ्या दिवशीदेखील थिएटरमध्ये अक्षरश: उड्या पडल्या. सलमान खान देखील चाहत्यांनी दिलेल्या या प्रतिसादामुळे भारावला आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांचे आभार व्यक्त करत एक ट्विट केले आहे.

सलमानच्या करिअरमधला ‘भारत’ हा चित्रपट आत्तापर्यंतचा सर्वात जास्त ओपनिंग असलेला चित्रपट ठरला आहे. चित्रपटाला ईदच्या सुट्टीचाही फायदा झाला. तर दुसऱ्या दिवशी देखील कमाईचा आकडा चांगला असल्याचे समीक्षकांनी म्हटले आहे. दुसऱ्या दिवशी जवळपास ३० कोटींची कमाई करत ‘भारत’ने दोनच दिवसात अर्धशतकापर्यंत मजल मारली आहे. आत्तापर्यंत या चित्रपटाने ७२.०३ कोटींची कमाई केली आहे.

एका ट्विटच्या माध्यमातून सलमानने चाहत्यांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळे आभार व्यक्त केले आहेत. त्याने लिहिले आहे, की सर्वांचे खूप आभार. माझ्या आत्तापर्यंतच्या करिअरमधला हा चित्रपट सर्वात मोठा ओपनर आहे. यापेक्षाही जास्त जेव्हा चित्रपटाच्या एका सीनमध्ये राष्ट्रगीत सुरू असताना संपूर्ण थिएटरमधील प्रेक्षक सन्मानाने उभे राहतात, तो क्षण माझ्यासाठी सर्वात जास्त अभिमानाचा आहे. यापेक्षा जास्त आदर कोठेही नाही. जय हिंद.

भारतातील ४७०० स्क्रिन्सवर ‘भारत’ चित्रपट झळकला आहे. सलमान खानच्या पाच विविध भूमिका या चित्रपटात पाहायला मिळत आहेत. त्याच्यासोबतच कतरिना कैफच्याही करिअरमधील हा सर्वाधिक ओपनर असलेला चित्रपट ठरला आहे. आता आठवड्याच्या शेवटपर्यंत या चित्रपटाच्या कमाईत आणखी किती भर पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

Leave a Comment