आंध्र प्रदेशाला तब्बल पाच उपमुख्यमंत्री..!


अमरावती – आपल्या मंत्रिमंडळात आंध्र प्रदेशचे नवनियुक्त मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी पाच जणांना उपमुख्यमंत्री पद दिले आहे. असा निर्णय भारताच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच, घेण्यात आला आहे. जगन यांनी हा निर्णय मागासवर्गीयांना प्रतिनिधीत्व देण्याच्या उद्देशाने घेतला असल्याचे सांगितले आहे.

२५ जणांचे मंत्रिमंडळ मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी स्थापन केले आहे. ५ जणांना त्यात उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. खुद्द जगन मोहन रेड्डी यांनी आज सकाळी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत यासंबंधीची घोषणा केली. शनिवारी या नवीन मंत्रीमंडळाचा शपथविधी आयोजित करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्रीपदी निवडलेले सर्व सदस्य हे अनुसुचीत जाती, अनुसुचीत जमाती, मागास वर्ग, अल्पसंख्याक तसेच स्थानिक कापू समाजातील असतील, असे मुख्यमंत्री जगन रेड्डी यांनी सांगितले. मागील चंद्राबाबू नायडू यांच्या सरकरामध्येही दोन उपमुख्यमंत्री होते. त्यापैकी मागास वर्ग आणि कापू समुदायातील एका व्यक्तीला प्रतिनिधित्व देण्यात आले होते.

जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाने नुकत्याच पार पडलेल्या आंध्रप्रदेश विधानसभा निवडणुकीत १७५ पैकी १५१ जागांवर विजय मिळवला आहे. माजी मख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देसम पक्षाला केवळ २४ जागा जिंकता आल्या. शिवाय लोकसभेच्याही २५ पैकी २२ जागांवर वायएसआर काँग्रेसला यश मिळाले आहे.

दरम्यान, आम्हाला जगन मोहन रेड्डी यांच्या निर्णयाचा खूप आनंद झाला असून अनुसुचीत जाती-जमाती आणि अल्पसंख्याकांना त्यांच्या या निर्णयामुळे न्याय मिळाला आहे. जगन मोहन रेड्डी हे देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्री असल्याचे त्यांनी सिद्ध केले आहे, अशी प्रतिक्रिया वायएसआर कांग्रेसचे आमदार एम. एम. शेख यांनी दिली आहे.

Leave a Comment