तृणमुलच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या पोस्टकार्डला दिले असे उत्तर


कोलकाता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना जय श्रीराम लिहिलेली १० लाख पोस्ट कार्ड पाठवणार असल्याचे नवनिर्वाचित भाजप खासदार अर्जून सिंह यांनी सांगून या सर्वजणांना अटक करून दाखवण्याचे आव्हान ममतांना केले होते. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी आता याला प्रत्युत्तर देत पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘वंदे मातरम, जय हिंद, जय बांगला’ लिहिलेली १० हजार पत्रे पाठवण्याच निर्णय घेतला आहे.

जय श्रीरामच्या घोषणा ममता बॅनर्जींच्या गाडीसमोर येऊन देणे बरोबर आहे का? त्यांच्यासोबत येथील आमदार आणि खासदारही जय श्रीरामच्या घोषणा देत आहेत. आम्ही प्रत्युत्तर म्हणून पंतप्रधानाच्या गाडीसमोर जावून काही अशा घोषणा देणार नाही आणि त्यांचा मार्गही अडवणार नाही. पण एक संदेश आम्ही नक्की देणार आहोत. आम्ही प्रत्युत्तर म्हणून वंदे मातरम लिहिलेली १० हजार पोस्ट कार्ड पाठवणार आहोत.

ममता बॅनर्जी गेल्या बुधवारी उत्तर २४ परगाणा जिल्ह्यात गेल्या होत्या. ममतांच्या ताफ्यासमोर एका गटाने त्यावेळी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या होत्या. ममतांनी यावेळी गाडीतून खाली उतरत घोषणा करणारे बंगालचे नसून बाहेरची लोक आहेत. घोषणा करणाऱ्यांवर कारवाई करणार आहे, असे ममतांनी म्हटले होते.

Leave a Comment