पुण्यातील एकाच ब्रिजचे सलग तीन दिवस तीन पक्षांकडून उद्घाटन


पुणे : पुणेकरांनी असंख्यवेळा ‘पुणे तिथे काय उणे’ ही उक्ती खरी करुन दाखवली असल्यामुळे पुण्यात आता नव्याने काही कुतुहलजनक घडले, तरी त्यात नाविन्यता काहीच राहत नाही. तरी ‘पुणे तिथे काय उणे’ ही उक्ती पुण्यातील राजकारणाच्या बाबतीत फार क्वचित दिसून येते. पण या उक्तीला साजेसा असाच सध्याचा प्रसंग आहे. तीन वेगवेगळ्या पक्षांनी तीन वेगवेगळ्या दिवशी तीनवेळा पुण्यातील कोंढवा परिसरातील लुल्लानगर येथे बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचे उद्घाटन केले. पुण्यासह आता महाराष्ट्रभर मनसे, शिवेसना आणि भाजप यांच्यातील या श्रेयवादाची चर्चा रंगत आहे.

गेले अनेक दिवस कागदोपत्री पुणे शहरातून कोंढव्याला जात असताना लुल्लानगर चौकातील उड्डाणपूल अडकला होता. लुल्लानगर चौकातील उड्डाणपूल लष्कराच्या परवानग्या घेऊन काम पूर्ण होऊन एक महिना होत आले तरी तो सुरु नव्हता. पण आचारसंहिता संपताच कोणी उद्घाटन करायचे याच राजकारण सुरु झाले.

राजकीय कार्यक्रमावर लोकसभा निवडणूक आचारसंहिता असल्याने बंदी असते. पण कोंढवा परिसरातील लुल्लानगर चौकातील उड्डाणपूलाच उद्घाटन कोणी करायचे यावरुन आचारसंहिता संपताच स्थनिक मनसे नगरसेवक आणि भाजप आमदार यांच्यात वाद सुरु झाला आहे. पण वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सामान्य वाहन चालकाच्या हस्ते बुधवार 29 मे रोजी उद्घाटन करुन मनसेने उड्डाणपूल वाहतुकीला खुला केला आहे. यावर आमदारावर मनसे नगरसेवक साईनाथ बाबर यांनी टीका करत खर्च महापालिकेने केला, यात आमदारांचा काय संबध, असे म्हणत उद्घाटन केले.

कोंढवा परिसरातील लुल्लानगर चौकात मोठी वाहतूक कोंडी होत असल्यामुळे हा उड्डाणपूल ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सुरु झाला तर मोठी वाहतूक कोंडी समस्या सुटणार आहे. पण मनसे आणि भाजपमध्ये उद्घाटन कोणी करायचे या यावरुन श्रेयवाद सुरू झाला आहे. 2 जूनला पुण्याचे नवनिर्वाचित खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते भाजपने उद्घाटन ठेवले. तर मनसेने उद्घाटन राजकारण्याशिवाय करत मनसे स्टाईलने आंदोलन करत सामान्य नागरिकाच्या हस्ते उड्डाणपूल उद्घाटन करत नागरिकांसाठी पूल खुला केला आहे.

दरम्यान आजच सत्तेत वाटेकरी असलेल्या भाजपच्या मित्रापक्षाने अर्थात शिवसेनेने याच उड्डाणपुलाचे माजी आमदार महादेव बाबर यांच्या हस्ते उद्घाटन केले आहे. तर याच पुलाचे उद्या (रविवार) भाजपकडून उद्घाटन करण्यात येणार आहे. हा पूल करण्यासाठी भाजपने 2009 पासून प्रयत्न करत असल्यामुळे शासकीय कार्यक्रम आहे तो असा कोणी करू शकत नाही. मी यासाठी खूप पाठपुरावा केला आहे मनसे काम पूर्ण नसताना श्रेय घेत आहेत विकासकामात राजकारण करू नका, असे आमदार योगेश टिळेकर म्हणाले.

Leave a Comment