भारतामध्ये आमचा देखील बरोबरीचा हिस्सा – ओवैसी


नवी दिल्ली: एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा असुदुद्दीन ओवैसी यांनी मुस्लिमांचा भारतामध्ये बरोबरीचा हिस्सा असून देशात आम्ही काही भाडेकरू म्हणून राहत नसल्याचे वक्तव्य केले आहे. दिल्लीतील एका सभेत बोलत होते. त्यांनी यावेळी म्हटले की, लोकसभा निवडणुकीत भाजपने ३०० जागा जिंकल्या म्हणजे देशात आम्ही मनमानी करू, असे पंतप्रधानांनी समजू नये. हे कदापि होणार नाही. मी पंतप्रधानांना भारतीय राज्यघटनेचा हवाला देत इतकेच सांगू इच्छितो की, मुस्लिमांच्या हक्कासाठी असुदुद्दीन ओवैसी हा तुमच्याशी लढत राहील.

आम्हाला भारताच्या राज्यघटनेने आमच्या धर्माचे पालन करण्याची मुभा दिली आहे. देशाचे पंतप्रधान जर मंदिरात जाऊ शकतात, तर मशिदीत जाण्याचा हक्क आम्हाला देखील आहे. हिंदुस्थानाला आम्हाला समृद्ध ठेवायचे आहे आणि ते आम्ही जरूर करु. पण आमचा हिस्सा या देशात बरोबरीचा आहे. आम्ही काही भाडेकरू नाही, असेही ओवैसी यांनी म्हटले.

नुकताच लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी कायदा आणायची भाषा करणारे योगगुरू रामदेव बाबा यांच्यावर ओवैसी यांनी निशाणा साधला होता. रामदेव बाबा यांनी तिसरे अपत्य जन्माला घालणाऱ्या जोडप्यांचा मतदानाचा हक्क काढून घ्यावा, असे म्हटले होते. ओवैसी यांनी त्याला ट्विटरवरून प्रत्युत्तर देताना म्हटले होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसरे अपत्य आहेत म्हणून त्यांचा मतदानाचा हक्क काढून घेता कामा नये. आपल्या पोटासोबत रामदेव बाबा काही करू शकतात, आपले पाय कसेही फिरवू शकतात. याचा अर्थ हा नाही की, फक्त तिसरे अपत्य असल्यामुळे नरेंद्र मोदींनी मतदानाचा हक्क गमवावा, असा टोला ओवैसी यांनी लगावला होता.

Leave a Comment