रामदेव बाबांचा विरोधकांना आगामी १५ वर्ष कपालभाती करण्याचा सल्ला


नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी काल राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात पार पडला. त्यावेळी २४ कॅबिनेट मंत्री, ९ स्वतंत्र कारभार सांभाळणारे राज्यमंत्री आणि २४ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी देश-विदेशातील एकूण ८००० लोक उपस्थित होते. योगगुरु रामदेव बाबांनी यादरम्यान विरोधकांना टोला लगावत सल्ला दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या पर्वाला सुरुवात झाली असून आता आगामी १० ते १५ वर्ष विरोधकांना कपालभाती करण्याची गरज असल्याचे रामदेव बाबांनी म्हटले आहे.

विरोधी पक्षांचे नेते निवडणूक निकालानंतर तणावग्रस्त आहेत. कदाचित पुढील १० ते १५ वर्ष त्यांना कपालभाती करण्याची गरज असल्याचा टोला रामदेव बाबांनी लगावला आहे. त्यांनी पुढे बोलताना नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात भारताला आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक आव्हानांना सामोरे जाण्यास मदत मिळेल अशी आशा व्यक्त केली. ज्या खासदारांनी अमित शाह, पियुष गोयल आणि नितीन गडकरी यांच्यासहित शपथ घेतली आहे ते लोकांच्या अपेक्षांवर खरे उतरतील. सर्वजण पुढील पाच वर्षात मेहनतीने काम करतील, असाही विश्वास रामदेव बाबांनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment