आता मोदी यांच्या वतीने सरकारवरही अमित शहांचे नियंत्रण राहील – उद्धव ठाकरे


नवी दिल्ली – केंद्रातील सत्ता पुन्हा काबीज करताना नरेंद्र मोदी यांच्याकडून देशाबरोबर जगाच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत. त्या दिशेने मोदींचे सरकार गरुडझेप घेईल अशी आशा बाळगायला हरकत नाही. मोदी हाच मोदी-2 सरकारचा चेहरा असल्याचे सामना संपादकीयच्या माध्यमातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यांच्या मंत्रिमंडळातील मोहरे काय करतात ते पाहायचे. अमित शहा यांचा चाबूक नाहीतर तेथे आहेच. मोदी सरकारला शहा यांच्या येण्याने बळ मिळेल असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे.

मोदी यांचे मंत्रिमंडळ कसे असेल याबाबत उत्सुकता असण्याचे तसे कारण नव्हते. जे हवे तेच मोदी व शहा यांना मंत्रिमंडळात आले व जे नको ते बाहेर राहिले. आता मंत्रिमंडळाचा चेहरामोहरा स्पष्ट झाला आहे. या मंत्रिमंडळात राजनाथ सिंह, नितीन गडकरी वगळले तर ‘दिग्गज’ किंवा ‘हेवीवेट’ म्हणावेत असे फारसे कोणी दिसत नाहीत. पण सगळ्यात महत्त्वाचे अमित शहा यांचे नाव आहे. अमित शहा भाजप विजयाचे शिल्पकार असल्यामुळे मंत्रिमंडळात ते येण्याविषयी अटकळ बांधली जात होती. त्यावर आता पडदा पडला आहे. शहा यांचे भाजपवर पूर्ण नियंत्रण आलेच आहे. मोदी यांच्या वतीने आता सरकारवरही त्यांचे नियंत्रण राहील असे उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे.

कोणते खाते अमित शहा हे स्वीकारतात? गृह खाते की संरक्षण खाते? शहा यांचे नेतृत्व अरुण जेटली यांनी निवृत्ती पत्करल्यामुळे अर्थ खात्यास मिळते का हे पाहण्यासारखे आहे. संरक्षण खाते शहा यांनी स्वीकारले तर पाकिस्तानचा प्रश्न कायमचा निकाली लागेल असा लोकांचा विश्वास आहे. गृह खाते त्यांनी स्वीकारले तर अयोध्येत राममंदिर सहज उभे राहील. शिवाय त्यांनी कश्मीरात 370 कलम हटविण्याची घोषणा केली आहे, त्यांच्या त्या कार्यास गती मिळेल. अमित शहा यांची समान नागरी कायदा लागू व्हावा अशी इच्छा होतीच. तीच देशभावनासुद्धा असल्याने समान नागरी कायद्याबाबतचे वीर सावरकरांचे स्वप्नही साकार होईल. नक्षलवाद आणि माओवाद्यांचा हिंसाचार मोडून काढला जाईल. जर शहा हे अर्थमंत्री झाले तर विकासकामांना आणि आर्थिक सुधारणांना गती मिळेल. शेतकरी व कष्टकऱ्यांना लाभ मिळतील. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीच्या प्रयत्नांना गती मिळेल. मुख्य म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण रोजच सुरू आहे. त्या घसरणीस खो बसेल. मोदी सरकारला शहा यांच्या येण्याने बळ मिळेल असे उद्धव ठाकरेंचे म्हणणे आहे.

Leave a Comment