मणिपूरमध्ये काँग्रेसला भगदाड, १२ आमदारांनी दिला राजीनामा


इंफाळ – ईशान्येकडील राज्यांत काँग्रेस पक्षाला लोकसभा निवडणुकीनंतर भगदाड पडत असून मणिपूरमधील काँग्रेसच्या १२ आमदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.

काँग्रेसचा ईशान्येकडील मणिपूर आणि नागालँड या दोन्ही लोकसभा मतदारसंघातील जागांवर पराभव झाला. भाजपचे उमदेवार या दोन्ही जागांवर विजयी झाले आहेत. काँग्रेसच्या १२ आमदारांनी या पराभवानंतर आपल्या पदाचा राजीनामा मणिपूर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गैखंगम यांच्याकडे सोपवला.

भाजपच्या वाटेवर राजीनामा देणारे आमदार असल्याची चर्चा आहे. मात्र, पराभवाची जबाबदारी स्वीकारत या आमदारांनी पक्षबांधणीसाठी राजीनामे दिल्याचे एका काँग्रेस आमदाराने सांगितले. पण भाजपचा ईशान्येकडील या राज्यांत वाढता प्रभाव पाहता विरोधी पक्षातील अनेक नेत्यांचा भाजपकडे ओघ वाढला असल्यामुळे भाजपमध्येच हे आमदारही प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपचे बीरेन सिंह यांच्या नेतृत्वात मणिपूरमध्ये स्थानिक पक्षांच्या पाठिंब्याने सरकार सत्तेत आहे. काँग्रेसला २०१७ च्या विधानसभआ निवडणुकीत २९ जागा मिळवता आल्या होत्या. पण ८ आमदारांनी त्यानंतर लगेच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आता १२ आमदारांनी राजीनामे दिल्याने काँग्रेसची दुबळी अवस्था झाली आहे.

Leave a Comment