नितीन गडकरींना कृषीमंत्री केल्याने शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील


मुंबई – नाशिकमधील एका शेतकऱ्याने मागील वर्षी कांदा मातीमोल भावात विकावा लागल्याने त्या शेतकऱ्याने मिळालेले पैसे निषेध म्हणून पंतप्रधान कार्यालयाला मनीऑर्डर करून पाठवले होते. त्याच शेतकऱ्याने आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून कृषीमंत्री नितीन गडकरी यांना करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. त्या शेतकऱ्याचे नाव संजय साठे असे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे व भाजपच्या भव्य विजयाबद्दल त्यांनी या पत्रातून अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर त्यांनी एक गांधी टोपी, दोन रुमाल भेट म्हणून पाठविली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मी अभिनंदन करु इच्छितो. यामुळेच मी परंपरेनुसार त्यांना एक पांढरी टोपी आणि दोन मोठे रुमाल पाठवले आहेत. कृषीमंत्री नितीन गडकरी यांना करण्यात यावे, मी नरेंद्र मोदींकडे यासाठी आग्रह केला आहे. जेणेकरुन आमच्या सर्व समस्या सुटतील, असे संजय साठे यांनी यासंबंधी बोलताना सांगितले.

नागपूर मतदार संघातून गडकरी पुन्हा निवडून आले आहेत. रस्ते, वाहतूक, महामार्ग, जहाजाच्या माध्यमातून वाहतूक, जलस्रोत, नद्या विकास, गंगा शुद्धीकरण या खात्यांचे ते केंद्रीय मंत्री होते. या शेतकऱ्याने त्यांना कृषीमंत्री बनवण्याची मागणी केली आहे.

संजय साठे यांनी गतवर्षी ७४० किलोग्रॅम कांद्याला कवडीमोल भाव आल्याने त्याच्या विक्रीतून आलेली रक्कम सरकारचा निषेध करत पंतप्रधान कार्यालयाला मनीऑर्डर केली होती. अत्यंत कवडीमोल भाव लासलगाव बाजार समितीच्या निफाड उपबाजार आवारात लिलावासाठी आणलेल्या कांद्याला मिळाला होता. संजय साठे यांनी त्यामुळे विक्रीतून आलेली १०६४ रुपयांची रक्कम मनीऑर्डरद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवून कांदा उत्पादकांच्या व्यथा समोर आणली होती. साठे यांनी केलेली ही मनी ऑर्डर परत आली होती. पोस्ट कार्यालयाने संजय साठे यांना बोलावून त्यांच्याकडे १०६४ रुपयांची रक्कम सुपूर्त केली होती.

Leave a Comment