
मुंबई – ९ ते १० काँग्रेस-राष्ट्रवादीच्या उमेदवारांना वंचित बहुजन आघाडीच्या मताधिक्याने पराभव पत्करावा लागल्यामुळे वंचित आघाडीचा राज्यात दबदबा निर्माण झाला आहे. वंचित घटकाला या बहुजन आघाडीचा फायदा झाला नसून या निवडणुकीत केवळ एमआयएमलाच लाभ झाला असल्याचे शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
‘वंचित’चा ‘किंचित’ लाभ एमआयएमला – नीलम गोऱ्हे
त्या पत्रकारांशी लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत बोलत होत्या. त्या म्हणाल्या, वंचित आघाडीने राज्यात सर्वत्र उमेदवार उभे केले. पण कुठेही विजय त्यांना मिळवता आला नाही. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनाही पराभव स्वीकारावा लागला. वंचित आघाडीचे उमेदवार म्हणून एमआयएमचे इम्तियाज जलिल यांना सांगण्यात आले असले तरी ते एमआयएमचेच उमेदवार असल्यामुळे वंचितचा खासदार निवडून आला असे म्हणता येणार नाही.
‘हम निजाम है’ असे जे लोक उजळ माथ्याने म्हणतात त्यांचा विजय झाला. तर आयुष्यभर ज्यांनी निजाम काळातल्या रझाकरांशी संघर्ष केला त्यांचा हा अवमान झाल्यासारखे आहे, असेही गोऱ्हे म्हणाल्या.
