येत्या ५० वर्षात देशाची लोकसंख्या १५० कोटींपेक्षा अधिक वाढता कामा नये – रामदेव बाबा


हरिद्वार – पुन्हा एकदा बहुमताने भाजप सरकार सत्तेत आले असून रामदेब बाबा यांनी त्यानिमित्त या सरकारसमोर लोकसंख्या वाढीच्या प्रश्नासह ३७० कलम काढून टाकण्याचे आव्हान असेल, असे सांगितले. त्यांनी हरिद्वार येथील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

देशाची लोकसंख्या ही एक मोठी समस्या असून यावर सरकारने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. संसाधनांची कमतरता आगामी काळात भासणार असून लोकसंख्या त्यासाठी नियंत्रणात असणे गरजेचे आहे. कोणालाही दोनपेक्षा अधिक मुलांना जन्म देण्याचा अधिकार दिला जाऊ नये. तिसरे मूल झाल्यास त्याला मतदानाचा, निवडणूक लढवण्याचा, आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा अधिकार नाकारावा, असे आवाहन सरकारला त्यांनी केले. देशाची लोकसंख्या येत्या ५० वर्षात १५० कोटींपेक्षा अधिक वाढता कामा नये, असे ते म्हणाले. घटनेतील कलम ३७० व ३५-अ देशात एकता प्रस्थापित करण्यासाठी काढून टाकण्याची मागणी त्यांनी केली. देशात एकच कायदा लागू केल्यानेच लोकशाही बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Leave a Comment