लोकसभा निवडणूकतील 10 श्रीमंत उमेदवारांचे काय झाले


नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर सध्या सोशल मीडियावर या निवडणुकीतील 10 श्रीमंत उमेदवारांचे काय झाले याची चर्चा सुरु आहे. या 10 श्रीमंत उमेदवारांमधील 5 उमेदवारांचा विजय झाला आहे, तर 5 जणांना पराभावाचा सामना करावा लागला आहे. देशातील 10 सर्वात श्रीमंत उमेदवारांमध्ये तीन आंध्र प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशमध्ये प्रत्येकी दोन आणि तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणामध्ये प्रत्येकी एक एक उमेदवार होते. श्रीमंत आणि विजयी उमेदवारांमध्ये काँग्रेसचे नकुल नाथ यांचे नाव आहे तर पराभुतांमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांचे नाव आहे.

बिहारचे रमेश कुमार शर्मा हे देशातील सर्वात श्रीमंत उमेदवारांमध्ये पाटीलपुत्र या जागेतून अपक्ष लढले. त्यांचे यात डिपॉझीट जप्त झाले. केवळ 1556 मते त्यांना मिळाली. उमेदवारी अर्ज भरताना रमेश कुमार यांनी आपली संपत्ती 1107 कोटी असल्याचे जाहीर केले होते.

देशातील श्रीमंत उमेदवारांमध्ये काँग्रेसचे उमेदवार विश्वेश्वर रेड्डी यांचा दुसरा क्रमांक लागतो. पराभवाचा त्यांनाही सामना करावा लागला. त्यांना 14 हजार 317 मतांनी तेलंगणाच्या चेवेल्ला जागेतून टीआरएसच्या जी रंजीत रेड्डी यांनी हरविले. अपोलो समुहाचे अध्यक्ष सी.प्रताप रेड्डी यांचे जावई विश्वेश्वर हे दुसरे श्रीमंत उमेदवार ठरले. 895 कोटी रुपयांची संपत्ती असल्याची घोषणा त्यांनी केली होती. गेल्यावर्षीच ते टीआरएस सोडून काँग्रेसमध्ये सामील झाले होते.

देशातील तिसरे धनिक उमेदवार नकुल नाथ हे ठरले. 660 कोटींची संपत्ती त्यांच्याकडे आहे. छिंदवाडा मतदार संघातून ते 37 हजार 536 मतांनी हरले. 417 कोटी रुपयांच्या संपत्तीने कॉंग्रेसचे एच. वसंतकुमार हे देशातील चौथे धनिक उमेदवार ठरले. 2 लाख 59 हजार 933 मतांनी केंद्रीय मंत्री पोन राधाकृष्णन यांना त्यांनी मात दिली. 374 कोटींच्या संपत्तीने ज्योतिरादित्य सिंधिया हे देशातील पाचवे श्रीमंत उमेदवार ठरले. भाजपच्या कृष्ण पाल सिंह यांनी त्यांचा 1 लाख 25 हजार 549 मतांनी पराभव केला.

वायएसआर कॉंग्रेसच्या तिकिटावर विजयवाडा येथून वीरा पोटलूरी यांनी निवडणूक लढवली. पण ते 8 हजार 726 मतांनी तेदेपा उमेदवाराकडून हरले. 347 कोटींची त्यांच्याकडे संपत्ती आहे. कॉंग्रेसचे उदय सिंह देशातील सातवे सर्वात श्रीमंत उमेदवार होते. ते बिहारच्या पूर्णिया जागेतून 2 लाख 63 हजार 461 मतांनी हरले. त्यांनी 341 कोटी रुपयांची संपत्ती असल्याची घोषणा केली होती.

कॉंग्रेसच्या टिकिटावर बंगळुरू ग्रामीण येथून देशातील सर्वाधिक श्रीमंतांमध्ये डी.के. सुरेश 2 लाख 6 हजार 870 मतांनी जिंकले. नववे श्रीमंत उमेदवार वायएसआर कॉंग्रेस पार्टीच्या केआरके राजा यांनी नासापुरम येथून 31 हजार 909 मतांनी विजय मिळवला. त्यांनी 325 कोटी रुपयांची संपत्ती घोषित केली होती. सर्वाधिक श्रीमंतांमध्ये दहाव्या स्थानी जयदेव गल्ला 4 हजार 205 मतांनी जिंकले. त्यांनी गुंटूर जागेतून हा विजय मिळवला असून 305 कोटींच्या संपत्तीची घोषणा केली होती.

Leave a Comment