अनिल अंबानींनी मागे घेतला काँग्रेसविरोधातील पाच हजार कोटींचा मानहानीचा खटला


नवी दिल्ली – काँग्रेस तसेच नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राविरोधातील मानहानीचा खटला मागे घेण्याचा निर्णय उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपने घेतला आहे. रिलायन्सने अहमदाबाद येथील न्यायालयात पाच हजार कोटींचा मानहानीचा दावा ठोकला होता.

राफेल करारासंदर्भात लेख निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्रातून प्रसिध्द केल्याचा आरोप रिलायन्सकडून करण्यात आला होता. अंबानी यांचे वकिल राकेश पारेख यांनी न्यायालयात हा खटला मागे घेणार असल्याचे सांगितले, तशी सूचनाही काँग्रेस तसेच नॅशनल हेरॉल्ड यांना दिली असल्याची माहिती त्यांनी न्यायालयाला दिली.

काँग्रेसचे नेते रणदीपसिंह सुरजेवाला, ओमन चंडी, सुनील जाखड, अशोक चव्हाण, संजय निरूपम आदी नेत्यांविरोधात तसेच नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राविरोधात रिलायन्स डिफेन्स कंपनीने मानहानीचा दावा दाखल केला होता. काही दिवसांपूर्वी रिलायन्स डिफेन्स या कंपनीची स्थापना राफेल कराराची घोषणा होण्याच्या आधी करण्यात आली होती, असा लेख नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्रात प्रसिध्द झाला होता.

Leave a Comment