एक्झिट पोलच्या अंदाजावर यापूर्वी २००४ आणि २००९मध्ये फेरले होते पाणी


मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील निवडणुकीचे मतदार पार पडताच विविध माध्यमांनी केलेले एक्झिट पोल समोर येई लागले आहेत. पण हे एक्झिट पोल म्हणजे एक प्रकारचे तात्पुरते समाधान असून निवडणुकीच्या निकालानंतर सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. माध्यमांमध्ये जाहिर झालेली आकडेवारी निकालानंतर वेगळी देखील असू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण यापुर्वी देखील एक्झिट पोल फोल गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. याचे उत्तम उदाहरण २००९ मधील एक्झिट पोल ठरले आहे. त्याव्यतिरिक्त ही एक्झिट पोल अनेकदा खोटी ठरली असल्याचे इतिहास देखील आहे.

रविवारी लोकसभा निवडणुकीच्या शेवटचा टप्प्यात मतदान संपताच, एक्झिट पोलचा धडका सर्वच माध्यमांमध्ये सुरु आहे. जाहिर झालेल्या एक्झिट पोलनुसार पुन्हा एकदा एनडीए सरकार बनवेल असे दाखवले जात आहे. तर विरोधकाच्या भूमिकेत यूपीएला पुन्हा बसण्याची वेळ येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. एक्झिट पोलचे बहुतांश अंदाज २०१४ ला खरे ठरले आहेत. पण हे अंदाज त्याआधीच्या सलग दोन लोकसभा निकालांआधी सपशेल आपटले. एक्झिट पोलच्या अंदाजावर २००४ आणि २००९ मध्ये पाणी फेरले गेले होते. एक्झिट पोलच्या सर्वच एजन्सी त्यावेळी तोंडघशी पडल्या होत्या.

एजन्सींनी २००४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर केलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार २२५ जागांवर एनडीएला तर यूपीएला १८३ ठिकाणी विजय मिळवता येईल असा अंदाज वर्तवला गेला होता. प्रत्यक्षात आलेला निकाल वेगळा होता. एनडीएला २२५ चा अंदाज असताना त्यांना १८९ ठिकाणी विजय मिळवता आला. भाजपला फक्त १३८ जागा मिळाल्या होत्या. यूपीएला १८३ जागांचा अंदाज एक्झिट पोलने दाखवला होता. प्रत्यक्षात, मात्र त्याच यूपीएचे २२२ खासदार निवडून आले होते. त्यामुळे २००४ मध्ये एजन्सींनी केलेल्या एक्झिट पोलचे सर्व अंदाज चुकले होते.

त्याचबरोबर एक्झिट पोलची परिस्थिती २००९मध्ये देखील पहायला मिळाली होती. एजन्सींनी २००९ मधील लोकसभा निवडणुकीत केलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार यूपीएला १९९ आणि एनडीएला १९७ जागांवर विजय मिळवता येईल असा अंदाज वर्तवला होता. प्रत्यक्षात यूपीएला २६२ आणि एनडीएला १५९ ठिकाणी विजय मिळवता आला होता. यावेळी एक्झिट पोलच्या अंदाज खोटा ठरला होता तर यूपीएच्या जागा प्रचंड वाढताना पहायला मिळाल्या होत्या.

भाजपला सरासरी ४० जागांवर विजय मिळेल तर कॉंग्रेसचे ४६ आमदार निवडणून येतील असा अंदाज २०१८ मध्ये छत्तीसगढमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एजन्सींनी केलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीतून समोर आले होते. निकाल हाती आल्यानंतर कॉंग्रेसला ६८ तर भाजपला १५ जागांवर विजय मिळवता आला होता. यावेळीही एक्झिट पोलची आकडेवारी खोटी ठरली होती. त्यामुळे २०१९ लोकसभा निवडणुकीतील एजन्सींच्या एक्झिट पोलचे आकडे कितपत खरे ठरणार हे २३ रोजीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

Leave a Comment