मोदींसमोर निवडणूक आयोगाचे सपशेल लोटांगण – राहुल गांधी


नवी दिल्ली – काल लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान पार पडल्यानंतर निवडणूक आयोगावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली. पंतप्रधान मोदी यांच्यासमोर निवडणूक आयोगाने सपशेल लोटांगण घातल्याचा आरोप आरोप राहुल गांधी यांनी केला. तसेच त्यांनी मोदींच्या केदारनाथ यात्रेलाही नाटक असे संबोधले आहे.

निवडणुकीचे नियमन, ईव्हीएम गोंधळ, तसेच निवडणुकांच्या तारखा यांचे सोयीस्कर आयोजन केले असल्याचा आरोप सरकार आणि निवडणूक आयोगावर राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला. तसेच आचारसंहितेच्या काळात ‘नमो टीव्ही’, ‘मोदी आर्मी’ आणि आता केदारनाथमधील नाटकबाजी हे निवडणूक आयोगाने मोदींसमोर शरणागती पत्करल्याचे लक्षण असल्याचे ते म्हणाले. निवडणूक आयोगच जर अशा प्रकारे दबावाच्या स्थितीत राहिला तर त्याची प्रतिष्ठा राहणार नाही, असेही ते म्हणाले.

दरम्यान, यापूर्वीही राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर टीका केली होती. राहुल गांधी दिल्लीतील १७ मे रोजी झालेल्या एका सभेत म्हणाले होते की, पंतप्रधान आणि भाजपसाठी निवडणूक आयोगाचे वेगळे नियम व कायदे असून इतर विरोधी पक्षांसाठी वेगळी नियमावली असल्याचे सांगत भेदभाव आयोग करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. शिवाय प्रचारासाठी मोदींना सोयीस्कर ठरतील अशा तारखाच निवडणुकीसाठी ठरवल्या गेल्याची टीकाही त्यांनी केली.

Leave a Comment