दिग्दर्शक राघव लॉरेन्सने सोडला अक्षयचा ‘लक्ष्मी बॉम्ब’


बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार लवकरच ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला असून अक्षय या हॉरर चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताच्या भूमिकेत दिसणार असल्यामुळे, सध्या चित्रपटाविषयी चर्चा सुरू असतानाच चित्रपटातून दिग्दर्शक राघव लॉरेन्स यांनी काढता पाय घेतला आहे.

पैसा आणि प्रसिद्धीपेक्षाही या जगात तुमचा आत्मसन्मान अधिक महत्त्वाचा आहे. तामिळमध्ये एक प्रसिद्ध म्हण आहे की, तुम्हाला ज्या घरात मान मिळत नाही, कधीही त्या घराची पायरी चढू नका. त्यामुळेच, या चित्रपटातून मी काढता पाय घेत आहे. चित्रपट सोडण्याचे कारण मी सांगू शकत नाही, कारण यासाठी एक नव्हे तर अनेक कारणे आहेत. त्यातील एक कारण हे आहे, की नुकताच चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. पण मला याबद्दल कोणतीही कल्पना दिली गेली नाही आणि चर्चाही केली गेली नाही.

एका दिग्दर्शकासाठी ही अत्यंत वेदनादायक गोष्ट आहे, की तुमच्याच चित्रपटाचे पोस्टर तुमच्याशिवाय इतरांकडून प्रदर्शित केले जाते. या पोस्टरचे डिझाईन मला स्वतःच समाधानकारक वाटले नाही, असे कोणत्या दिग्दर्शकासोबत कधीच घडू नये. मी चित्रपट सोडताना माझी स्क्रीप्ट माघारीही घेऊ शकतो, कारण याबद्दल मी कोणतीही अॅग्रीमेंट साईन केलेली नाही. पण ही स्क्रीप्ट मी त्यांना द्यायला तयार आहे, कारण ती माघारी घेतल्यास हे प्रोफेशनल राहणार नाही आणि मी अक्षय सरांची खूप इज्जत करतो. ते त्यांच्या इच्छेनुसार त्यांना हवा तो दिग्दर्शक निवडू शकतात. लवकरच मी अक्षय सरांची भेट घेऊन त्यांना ही स्क्रीप्ट देणार आहे आणि व्यवस्थितपणे यातून बाहेर पडणार आहे, असे म्हणत त्यांनी चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment