साध्वी प्रज्ञाच्या चुकीला माफी नाही – नरेंद्र मोदी


नवी दिल्ली: न्यूज २४ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नथुराम गोडसे हा देशभक्त होता, या वक्तव्यासाठी मी साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना कदापी माफ करणार नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी यावेळी म्हटले की, महात्मा गांधी किंवा नथुराम गोडसे यांच्यासंदर्भात साध्वी प्रज्ञा यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत वाईट होते. ते समाजाच्यादृष्टीनेही चुकीचे असून साध्वी प्रज्ञा यांनी या सगळ्या प्रकारानंतर जरी माफी मागितली असली तरी, त्यांना मी कधीच पूर्णपणे माफ करू शकत नाही, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

तत्पूर्वी साध्वी प्रज्ञा यांच्या वक्तव्याबद्दल भाजपध्यक्ष अमित शहा यांनीदेखील तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. हे त्यांचे वैयक्तिक मत असले तरी सार्वजनिक जीवनातील भाजपची प्रतिष्ठा आणि विचारधारेच्या दृष्टीकोनातून पक्षाने हे वक्तव्य गांभीर्याने घेतले आहे. साध्वी प्रज्ञा यांच्याशिवाय नलीन कटील आणि अनंतकुमार हेगडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यांचीही शिस्तपालन समितीकडून चौकशी केली जाणार आहे. शिस्तपालन समिती येत्या १० दिवसांत याचा अहवाल पक्षाला सादर करेल, असे अमित शहा यांनी सांगितले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी नथुराम गोडसे देशभक्त असल्याचे म्हटले होते. नथुराम गोडसे हे देशभक्त होते, आहेत आणि राहतील. त्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या लोकांनी एकदा आत्मपरीक्षण करावे. या निवडणुकीत जनता अशा लोकांना धडा शिकवेल, असे साध्वी प्रज्ञा यांनी म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर बराच गदारोळ झाला होता. अखेर टीकेचा ओघ वाढल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांनी नमती भूमिका घेत माफीही मागितली होती.

Leave a Comment