नरेंद्र मोदींच्या पत्रकार परिषदेवर राज ठाकरेंची टीका


मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीवरुन टीका केली आहे. राज ठाकरेंनी मोदींवर मौन की बात, असे ट्विट करत निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमित शहा यांनी शुक्रवारी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत व्यासपीठावर उपस्थित होते. पण एकाही प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले नाही. पक्षाध्यक्षांची ही पत्रकार परिषद असल्याने मी पक्षशिस्तीनुसार उत्तरे देणे योग्य नसल्याचे कारण त्यांनी दिले. राज ठाकरे यांनी यावरुन शुक्रवारी रात्री ट्विट करत मोदींवर निशाणा साधला. राज ठाकरे यांनी या ट्विटमध्ये पंतप्रधानांची पत्रकार परिषद…मौन की बात, असे म्हटले आहे.


दरम्यान, मोदी आणि शहा संयुक्तपणे ही पत्रकार परिषद घेतील, अशी चर्चा होती. मोदी यांना त्यानुसार व्यासपीठावर पाहून पत्रकार आणि माध्यम प्रतिनिधींमध्ये उत्साह संचारला. त्यांची सत्तेवर आल्यापासून गेल्या पाच वर्षांतील ही पहिलीच पत्रकार परिषद असल्याने कमालीची उत्सुकता निर्माण झाली होती. मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता झाली असल्याने पत्रकारांच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे देतील अशी अपेक्षा होती, ती मात्र पुन्हा एकदा फोल ठरली.

Leave a Comment