अनिल सौमित्र यांचे भाजपकडून निलंबन


नवी दिल्ली – भाजपकडून अखेर नेते अनिल सौमित्र यांचे निलंबन करण्यात आले असून त्यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.

दरम्यान मध्य प्रदेश भाजपचे संपर्क विभाग प्रमुख अनिल सौमित्र यांनी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यानंतर वादग्रस्त वक्तव्य केले होते. महात्मा गांधी पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते. त्यांच्यासारखे कोट्यवधी पुत्र भारतात आहेत. त्यात काही लायक तर काही नालायक असल्याचे अनिल सौमित्र यांनी म्हटले आहे.

अनिल सौमित्र म्हणाले, पाकिस्तानच्या निर्माणाचे षडयंत्र इंग्रजांनी रचले होते. नेहरू आणि जिना यांची हे षडयंत्र पुढे घेऊन जाण्यासाठी मुख्य भूमिका होती. या दोघांचे स्वप्न पूर्ण झाले कारण दोघांनाही पंतप्रधान बनायचे होते. या पूर्ण प्रक्रियेत त्यांना गांधीजींचा आशीर्वाद मिळाला. काँग्रेसने इंग्रजांच्या षडयंत्रांना पूर्ण करण्यासाठी महात्मा गांधी यांना राष्ट्रपिताचा दर्जा दिला. पण इतर महापुरुषांचे देशाला स्वतंत्र करण्यासाठी योगदान आहे. सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेसने हे केले. गांधीजींच्या नावाने काँग्रेस मते मागत असल्याचा आरोपही अनिल सौमित्र यांनी केला.

अनिल सौमित्र म्हणाले गांधीजी राष्ट्रपिता नाही, तर राष्ट्रपुत्र होते. पाकिस्तानचे निर्माण होत असताना गांधीजींनी नेहरू आणि जिना या दोघांनाही आशीर्वाद दिला. जर महात्मा गांधी हे फादर ऑफ नेशन होऊ शकतात तर पाकिस्तानचे होतील, भारताचे तर ते पुत्रच असतील. त्यांच्या या वक्तव्याची पक्षाकडून गंभीर दखल घेण्यात आली असून भाजपने त्यांना निलंबित केले असून यावर ७ दिवसांमध्ये उत्तर मागितले आहे.

Leave a Comment