‘त्या’ वक्तव्यावरुन साध्वी प्रज्ञांचा माफीनामा


नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकींच्या प्रचारादरम्यान झालेल्या रोड शोमध्ये भोपाळमधून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणाऱ्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा देशभक्त असा उल्लेख केला होता. त्यानंतर विरोधकांनी त्यांना धारेवर धरल्यानंतर त्यांनी आपण केलेले वक्तव्य आपले वैयक्तिक असल्याचे म्हणत माझ्या वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास केला. कुणाच्या भावना जर या वक्तव्यामुळे दुखावल्या असतील तर माफी मागत असल्याचे प्रज्ञासिंह ठाकूर यांनी म्हटले आहे.

मी एका रोड शोमध्ये होते, मला भगव्या दहशतवादाबाबत प्रश्न त्यावेळी विचारण्यात आला. माझ्या तोंडून चालता चालता ते वक्तव्य आले. माझी कुणालाही दुखावण्याची भावना नव्हती. देशासाठी गांधीजी यांनी दिलेले योगदान हे कधीही विसरता येणार नाही. पक्षाचा आदेश मानणारी मी एक कार्यकर्ता आहे. जी भूमिका पक्षाची असेल तीच भूमिका माझी असणार असल्याचे प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या.

प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलेल्या वक्तव्याचा भाजप नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनी निषेध केला होता. प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याकडून पक्ष याबाबतचे स्पष्टीकरण मागणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. या वक्तव्याबाबत प्रज्ञासिंह ठाकूर यांनी जाहीर माफी मागायला हवी, असेही पक्षाकडून प्रज्ञासिंह ठाकूर यांना सांगण्यात आले होते.

Leave a Comment