स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्यांमधून हद्दपार होणार इंटेक्स


नवी दिल्ली : भारतीय स्मार्टफोन बनवणाऱ्या कंपन्यांच्या यादीतून कार्बन मोबाईलनंतर आता इंटेक्स टेक्नोलॉजीही लवकरच हद्दपार होण्याची शक्यता आहे.भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये चिनी कंपन्यांचा असलेला दबदबा हे यामागचे मुख्य कारण आहे. एकेकाळी भारतीय मार्केटमध्ये मायक्रोमॅक्सनंतर इंटेक्स सर्वात मोठी दुसरी कंपनी होती. कंपनीचा मार्केटमधील त्यावेळी हिस्सा 13 टक्के होता. पण प्लांट आता पूर्णपणे बंद पडल्यामुळे ही भारतीय कंपनी स्मार्टफोन मार्केट सोडणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

यापूर्वी मायक्रोमॅक्स, इंटेक्स, लावा आणि कार्बन या चार भारतातील प्रमुख कंपन्या होत्या. पण इंटेक्स गेल्यानंतर मायक्रोमॅक्स आणि लावा कंपन्याच उरतील. पण मायक्रोमॅक्स आणि लावा यांची परिस्थितीही अत्यंत खराब आहे. काऊंटरपॉईंटच्या सर्वेक्षणानुसार, या कंपन्यांचा मार्चपर्यंत मार्केटमध्ये केवळ 3 टक्के शेअर उरला आहे.

हा आकडा 2015 मध्ये 40 टक्के होता. दुसरीकडे सध्या चायनीज कंपन्यांचा 65 टक्के शेअर झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून इंटेक्सकडून नवा फोन लाँच करण्यात आलेला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, 500 कोटी रुपये गुंतवणूक केलेला नोएडाचा प्लांट विक्रीला काढल्याचेही बोलले जात आहे. या प्लांटमध्ये कंपनीने 1500 कोटींची गुंतवणूक केली होती, ज्यामध्ये एका वर्षात 40 मिलियन फोन तयार करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पण या प्लांटची गरज आता उरलेली नाही.

इंटेक्सचे संचालक केशव बन्सल यांच्या मते, कंपनीचा व्यवसाय कमी झाला आहे. ग्रेटर नोएडाचा प्लांट संपूर्ण भागात महत्त्वाचा होता. पण आता मार्केटमधून बाहेर गेल्यानंतर नवा पर्याय शोधत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. दमदार फीचर्ससह एकामागोमाग एक स्मार्टफोन चायनीज कंपन्यांकडून लाँच केले जात आहेत, भारतात ज्याला मोठ्या प्रमाणात पसंती दिली जात आहे. भारतीय कंपन्यांवर ही वेळ या कंपन्यांना तोंड न देऊ शकल्याने आली आहे. भारतीय कंपन्या फायदा होत नसल्याने बंद होत आहेत. कारण, ग्राहकांची पसंती चायनीज फोनला आहे.

Leave a Comment