५०० रुपयांच्या नोटांची घडी घालताच होत आहेत तुकडे


सांगली – सांगली जिल्ह्यातील विटा तालुक्यात पाचशे रुपयांच्या नव्या नोटांची घडी घालताच तुकडे होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार एका वृद्ध महिलेच्या बाबतीत घडला असून नव्या पाचशेच्या नोटांबाबत यामुळे प्रश्न निर्माण झाला आहे. रिझर्व्ह बँकेने त्यामुळे याची दखल घ्यावी, अशी नागरिकांकडून मागणी करण्यात येत आहे.

दीड महिन्यांपूर्वी सांगली जिल्ह्यातील विटा येथे मोलमजुरी करणाऱ्या एका वृद्ध महिलेला कामाच्या मोबदल्यात ७ हजार रुपये मिळाले होते. घरातील एका कपाटात तिने या नोटा ठेवल्या होत्या. तिने सोमवारी बाजारात जाण्यासाठी ७ हजारांमधून साडे तीन हजार रुपये काढले आणि रुमालात बांधून बाजारात नेले. यावेळी महिलेने मिरची खरेदीनंतर पैसे देण्यासाठी पाचशेची नोट काढली असता, त्या नोटेचे आपोआपच तुकडे पडल्यानंतर आपल्या जवळच्या सर्व नोटांची महिलेने तपासणी केल्यानंतर सुकलेल्या पानाचे तुकडे पडल्याप्रमाणे नोटांचे तुकडे पडत असल्याचे तिच्या निदर्शनास आले.

शेजारी राहणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते अनिल राठोड यांच्या निदर्शनास घाबरलेल्या महिलेने ही बाब आणून दिली. राठोड यांनी यावर महिलेच्या घरातील इतर पाचशेच्या नोटांची तपासणी केली. त्यांना नोटांची घडी घातल्यानंतर त्या मोडून पडत असल्याचे निदर्शनास आले. राठोड यांनी या प्रकारानंतर या सर्व नोटा घेऊन शहरातील स्टेट बँक गाठली आणि या नोटा खऱ्या आहेत का, याची शहानिशा केली. त्यावेळी या सर्व नोटा खऱ्या असल्याचे समोर आले. मात्र, या नव्या पाचशेच्या नोटांचे, अशा पद्धतीने कसे तुकडे होतात. याबाबत बँक अधिकारीसुद्धा संभ्रमात पडले.

स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांकडून एखाद्या केमिकल किंवा अति उष्णतेच्या संपर्कात आल्याने हा प्रकार होत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास ही बाब आणून देण्याची मागणी राठोड यांनी केली. विट्यात या प्रकारामुळे खळबळ उडाली असल्यामुळे आपल्याकडील पाचशेच्या नोटा बदलण्यास अनेकांनी सुरुवात केली आहे.

Leave a Comment