आता बनणार ‘भूल भुलैय्या’चा सिक्वेल ?


२००७ साली अक्षय कुमारचा ‘भूल भुलैय्या’ हा चित्रपट रिलीज झाला होता. त्याच्या या हॉरर कॉमेडी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील दमदार कमाई केली होती. प्रेक्षकांनाही अक्षय कुमारचा कॉमेडी अंदाज भावला होता. आता या चित्रपटाचा तब्बल १२ वर्षानंतर सिक्वेल बनणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

यासंदर्भात एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘भूल भूलैय्या’चा सिक्वेल येणार असल्याची माहिती चित्रपट आणि संगीत निर्माते भूषण कुमार यांनी दिली आहे. ‘भूल भूलैय्या’च्या सिक्वेलसाठी मागील काही वर्षांपासून प्रयत्न करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. याबद्दल चित्रपट लेखक फरहाद सामजी यांच्याशी चर्चा सुरू आहे. नवे कलाकार या चित्रपटात झळकणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

सध्या सिक्वेलच्या कथेवर काम सुरू आहे. कथा पूर्ण झाल्यावर या चित्रपटात कोणते कलाकार भूमिका साकारणार ते ठरवण्यात येणार आहे. दोन आठवड्यांपूर्वी प्रॉडक्शन हाऊसकडून ‘भूल भूलैय्या -२’, असे शिर्षकही नोंदवण्यात आले आहे. तमिळ चित्रपट ‘चंद्रमुखी’चा ‘भूल भूलैय्या’ हा रिमेक होता. विद्या बालन, शाइनी अहूजा, अमिषा पटेल, अक्षय कुमार, परेश रावल, हे कलाकार या चित्रपटात झळकले होते. अलिकडेच हॉरर कॉमेडी असलेल्या ‘स्त्री’ चित्रपटानेही बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे. हॉरर कॉमेडी असलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने आता ‘भूल भूलैय्या’च्या सिक्वेलचीही निर्मिती करण्यात येणार आहे.

Leave a Comment