राहुल गांधींनी त्या वक्तव्यावरुन सॅम पित्रोदांचे कान टोचले


नवी दिल्ली – सॅम पित्रोदा यांनी दिल्लीत १९८४ साली घडलेल्या शीख विरोधी दंगलीसंदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अखेर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपले मौन सो़डले आहे. अयोग्य वक्तव्य सॅम पित्रोदा यांनी केले असून त्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे असे राहुल गांधी यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटले आहे. राहुल गांधी यांनी आपली भूमिका स्पष्ट करण्याआधीच सॅम पित्रोदा यांनी त्या वक्तव्याबद्दल दिलगीरी व्यक्त केली.

लोकसभा निवडणुकीचे देशात अजून दोन टप्प्याचे मतदान बाकी आहे. शीख विरोधी दंगलीसंदर्भात सॅम पित्रोदा यांनी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला दिल्ली आणि पंजाब या दोन राज्यात फटका बसू शकतो. भाजपने पित्रोदा यांच्या वक्तव्यावरुन काँग्रेसला कोंडीत पकडले आहे. राहुल गांधी यांनी त्या पार्श्वभूमीवर आता आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

१९८४ सालच्या शीख विरोधी दंगल प्रकरणात न्याय मिळाला पाहिजे. याला जे कोणी जबाबदार आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माझी आई सोनिया गांधी यांनी माफी मागितली आहे. जे काही १९८४ साली घडले ते भयंकर दु:खद होते. पुन्हा असे घडता कामा नये. जे सॅम पित्रोदा म्हणाले ते अयोग्य आहे. याबद्दल मी त्यांच्याशी थेट बोलणार आहे. त्यांच्या वक्तव्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे असे राहुल यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

सॅम पित्रोदा यांनी या प्रकरणी मी शीख बांधवांच्या जखमांवर मीठ चोळण्यासाठी १९८४ ची दंगल घडून गेली हे बोललो नव्हतो. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. माझ्या वक्तव्यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी दिलगीरी व्यक्त करतो असे म्हटले आहे.

Leave a Comment