१ जूनला केरळात दाखल होणार मान्सून..!


मुंबई – सर्वांनाच नैऋत्य मान्सूनच्या आगमनाची उत्सुकता लागली आहे. शेतीसह अनेक क्षेत्रातील घडामोडींना मान्सूनच्या आगमनानंतर वेग येतो. याच काळात देशातील एकूण पर्जन्यमानापैकी ७० टक्के पाऊस पडतो. शेती आणि अर्थव्यवस्थेवर मान्सूनचा थेट परिणाम होत असल्याने त्याच्या आगमानाकडे संपूर्ण देश मोठ्या आशेने डोळे लावून बसला आहे. हवामान शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या स्कायमेट या खासगी संस्थेने याच पार्श्वभूमीवर मान्सूनचा प्राथमिक अंदाज जारी केला आहे.

शेतकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण करणारी मान्सून आगमनाची वार्ता ठरते, कारण, मान्सूनला उशीर झाला तर त्याचा परिणाम खरीप हंगामावर होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या शहरात यंदाचा मान्सून अंदाजे कधीपर्यंत दाखल होतो, याचा एक आढावा स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने सादर केला आहे. त्यानुसार महाराष्ट्रात १० जून पर्यंत मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला आहे.

राज्यासह कर्नाटक, राजस्थान,गुजरात,एमपी, बिहार या भागात येत्या पाच दिवसात (१०ते १५ मे) पावसाची शक्यता स्कायमेटने वर्तवली आहे. तर मान्सूनच्या आगमनाची आणि पुढील प्रवासाची माहिती १४ मेच्या पत्रकार परिषदेत देण्यात येणार असल्याचे स्कायमेटने म्हटले आहे.

मान्सून भारतात दाखल होण्यापूर्वी २० मेच्या दरम्यान अंदमान निकोबार बेटावर आपली हजेरी लावण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील १० दिवसात म्हणजेच १ जूनच्या सुमारास मान्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होईल. त्यानतंर ४ महिने तो भारतात मुक्कामी राहील. मान्सून आगमनाच्या पहिल्या टप्प्यात कोची, त्रिवेदम आणि चेन्नईसह तामिळनाडूचा जास्तीत जास्त भागात पावसाला सुरुवात होईल. त्यासोबतच ईशान्य भारतातील मणीपूर मिझोराम आणि त्रिपुरातही दाखल होईल.

मान्सून पुढच्या टप्प्यात म्हणजेच ५ जूनपर्यंत तो कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि बाजूच्या तेलंगणामध्ये सक्रीय होईल. तर उत्तर भारतातील मान्सूनची दुसरी शाखा दिसपूर अगरताळा गुवाहटी शिलाँग आणि इंफाळमध्ये हजेरी लावेल. पावसासाठी आतुरलेल्या मुंबई आणि कोलकाता शहरात मान्सूनचा पुढचा टप्पा हा दाखल होण्याचा आहे. मान्सून १० जून पर्यंत महाराष्ट्रासह ओडिशा, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगड, झारखंड आणि बिहारमध्ये दाखल होईल, असा प्राथमिक अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. मान्सूनची गती या प्रवासानंतर थोडी मंदावेल असेही त्यांनी सांगितले आहे.

पुढे १ जुलैला उत्तर प्रदेशातून मान्सूनचा पाऊस दिल्लीच्या उबंरठ्यावर जाऊन धडक देईल. तेथून उत्तराखंड हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरपर्यंत त्याचा प्रवास सुरूच राहिल. त्याचवेळी पंजाब आणि राजस्थानात पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात होईल. त्यानंतर मान्सून पुन्हा तब्बल १५ दिवासांच्या विश्रांती घेईल असेही स्कायमेटने म्हटले आहे. यावेळी मान्सूनचा पाऊस सरासरीच राहणार असून ९३ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाजही स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने वर्तविला आहे.

Leave a Comment