मोदींच्या आरोपांचे माजी नौदल प्रमुखांकडून खंडन


मुंबई : माजी नौदल प्रमुख एल रामदास यांनी आयएनएस विराट युद्धनौकेचा मनोरंजनासाठी माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि गांधी परिवाराने टॅक्सीसारखा वापर केला, हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप खोडून काढला आहे. सरकारी कामासाठी आयएनएस विराटवर माजी पंतप्रधान राजीव गांधी आले होते. कुणीही विदेशी व्यक्ती राजीव गांधी यांच्यासोबत नव्हती. नौदलाला बदनाम केले जात असून कौटुंबिक वापरासाठी आयएनएस विराट कधीच वापरण्यात आली नसल्यामुळे नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य खोटे असल्याचे एल रामदास यांनी सांगितले.

राजीव गांधी आणि सोनिया गांधींसोबत लक्षद्वीप येथे जाण्यासाठी आले होते. राजीव गांधी यांना राष्ट्रीय खेळांच्या बक्षीस वितरणासाठी मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. अधिकृत सरकारी कामासाठी लक्षद्वीप येथे त्यांनी आयएनएस विराटचा वापर केला होता, असे एल रामदास यांनी सांगितले.

कोणीही विदेशी नागरिक या दौऱ्यात पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबरोबर उपस्थित नव्हते. मी त्याच्याबरोबर या प्रवासात होतो. मी त्यांच्यासाठी एका डिनरचे आयोजनही केले होते. त्याचबरोबर इतर कोणतीही पार्टी आयएनएस विराट किंवा इतर कोणत्याही जहाजावर झाली नाही, असे एल रामदास यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधानांना त्यांच्या दौऱ्यात त्यांच्या पत्नीला घेऊन जाण्याची मुभा असते. त्यामुळे या प्रवासात काही बेटांवर राजीव गांधी आणि सोनिया गांधी गेले होते. पण तिथे लोकांना आणि अधिकाऱ्यांना ते भेटायला गेले होते. काही डायव्हर्सना त्यांच्या सुरक्षेसाठी ठेवण्यात आले होते. राहुल गांधी या प्रवासात राजीव गांधी यांच्याबरोबर नव्हते, असं एल रामदास यांनी सांगितलं.

याबाबतचा कार्यक्रम अनेक दिवस आधीच तयार केला जातो. कुठलेही जहाज हे गांधी कुटुंबियांच्या खासगी वापरासाठी वळवण्यात आले नव्हते, अशी माहिती एल रामदास यांनी दिली.

Leave a Comment